- नामदेव मोरे
नवी मुंबई : सुनियोजित शहराचा डिंगोरा पिटणाºया नवी मुंबईमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. यादव व सुभाष नगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खुराड्यात कोंबल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दाटीवाटीने वर्गात बसविले जात आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून त्यांच्यासाठी शाळेची इमारत कधी उभी राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्कूल व्हिजनच्या माध्यमातून जुन्या इमारती पाडून बहुमजली इमारती उभ्या करण्यास प्राधान्य दिले आहे. आवश्यकता नसलेल्या ठिकाणीही नवीन इमारती बांधल्या आहेत. नेरूळ सेक्टर ४ मधील नवीन इमारतीमध्ये शाळा सुरू करण्याऐवजी विभाग कार्यालय सुरू केले आहे. सीवूडमध्ये पूर्वी शाळा नसताना व ठोस प्रयोजन नसतानाही इमारत उभी करून ठेवण्यात आली आहे. बोनकोडे परिसरामध्ये एकाच शाळेसाठी ३५ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून कामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप इमारत अर्धवट अवस्थेमध्ये आहे. परंतु यादवनगर व सुभाषनगर या झोपडपट्टी परिसरामध्ये मात्र शाळा उभी करण्यात पालिकेला अपयश आले आहे. यादवनगर शाळा क्रमांक ७७ मध्ये सद्यस्थितीमध्ये १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शाळेसाठी इमारतच नाही. येथील नगरसेविकेच्या कार्यालयामध्ये व रामलीला कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजभोवती पत्रे लावून शाळा सुरू करण्यात आली आहे. याच ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गॅरेजसदृश जागेवर शाळा सुरू करण्यात आली आहे. मोठ्या शेडमध्ये पत्रे लावून वर्गखोल्या करण्यात आल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने विद्यार्थी बसविले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे नाही. येथील माजी नगरसेवक रामअशिष यादव यांनी शाळेसाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने पुरेसे शिक्षक दिले नसून फळा, खडू या अत्यावश्यक वस्तूही पुरविल्या जात नाहीत. वीज बिल व मालमत्ता कराची रक्कमही पालिका प्रशासन भरत नसल्याचे स्पष्ट झाले असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सुभाष नगर शाळा क्रमांक ७९ मध्येही बालवाडी ते पाचवीपर्यंत जवळपास २५० ते ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांना बसण्यासाठी वर्गखोल्याच नाहीत. समाजमंदिरामध्ये दोन वर्ग व शिक्षकांसाठी बसण्याची जागा आहे. समाजमंदिराच्या बाहेर पत्र्याचे शेड उभारून तेथे दोन वर्ग बसविले जात आहेत. गैरसोय टाळण्यासाठी दोन पाळीमध्ये शाळा सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी फक्त एक प्रसाधनगृह तयार केले आहे. विद्यार्थ्यांना खुराड्यात कोंबल्याप्रमाणे बसविले जात असून दोन्ही ठिकाणी नवीन इमारती उभ्या करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.यादवनगरसाठी भूखंड मिळालायेथील शाळेसाठी महापालिकेने एमआयडीसीकडून भूखंड मिळविला आहे. मुख्य रोडला लागून हा भूखंड आहे. भूखंड हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करून शाळेचे बांधकाम करण्यात यावे. सद्यस्थितीमध्ये यादवनगर शाळेमध्ये बाहेरील प्रभागामधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेश न देण्यामागे जागा उपलब्ध होत नसल्याचेही कारण असून जोपर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.सुभाषनगरमध्ये अतिक्रमणएमआयडीसीने सुभाषनगरमधील शाळेच्या इमारतीसाठी भूखंड राखून ठेवला आहे. परंतु त्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने अतिक्रमण काढून तत्काळ शाळेचे बांधकाम सुरू करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाचवीनंतर विद्यार्थ्यांना खासगी शाळेमध्ये शिक्षणासाठी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय कधी दूर होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यादवनगरमध्ये शाळेसाठी इमारत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आम्हीच शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली असून पाणी, वीज व मालमत्ता करही प्रशासन भरत नाही. शैक्षणिक साहित्य व पुरेसे शिक्षक उपलब्ध होत नाहीत. शाळेची इमारत बांधण्यासाठी भूखंड पालिकेने एमआयडीसीकडून घेतला असून नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय कायमस्वरूपी थांबेल.- रामअशिष यादव,माजी नगरसेवक, यादवनगरसुभाषनगरमध्ये समाजमंदिरामध्ये बालवाडी ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. पुढील शिक्षणासाठी यादवनगरमधील शाळेत प्रवेश दिला जात नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय सुरू असून ती थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.- बहादूर बिष्ट,नगरसेवक प्रभाग ८