- नामदेव मोरे, नवी मुंबई चरी कोपर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा २५ आॅक्टोबरला ८३ वा स्मृतीदिन. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप. या लढ्यामुळे खोती पद्धत बंद होवून हजारो कुळे सुरक्षित झाली. आठ दशकांनंतरही या लढ्याच्या स्मृती प्रकल्पग्रस्तांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. सिडको, जेएनपीटी, सेझ, विमानतळ या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या भूमिपुत्रांनी शासनाशी व संबंधित यंत्रणांविरोधात उभारलेल्या लढ्यांमुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे नाव देशभर गाजले. देशभरातील प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यांना दिशा देण्याचे काम येथील आंदोलकांनी केले असून त्याची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळात चरी कोपरच्या लढाईने झाली. कोकणातील खोती पद्धतीला विरोध करण्यासाठी २७ आॅक्टोबर १९३३ रोजी चरी - कोपर गावी २५ गावांमधील शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. कुळांनी जमीन कसायची व ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत रद्द करण्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुकण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत संपावर जावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी देश - विदेशात अनेक लढे दिले, आंदोलने केली होती पण संपावर जाण्याचा निर्णय जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे आंदोलन टिकूच शकत नाही. उपासमार सुरू झाली की आपोआप शेती कसण्यास सुरवात होईल असे सावकारांना वाटत होते. पण शेतकऱ्यांनी निर्धाराने लढण्यास सुरवात केली. मोलमजुरीची कामे करून अर्धपोटी राहून शेतकरी लढ्यात सहभागी झाले. अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली. पण सावकाराच्या दडपशाहीने मरण्यापेक्षा आंदोलन करून मरू असा निर्धार शेतकरी, त्यांचे कुटुंबीय व मुलांनीही केलेला. यामुळे अखेर १९३९ मध्ये संप मागे घेण्यात आला व पुढे त्याची दखल घेवून कूळ कायदा अस्तित्वात आला. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला. वर्षानुवर्षे गुलामगिरीसारखे राबणारी कुळे जमिनीची मालक झाली. या लढ्याला ८३ वर्षे होत असून आजही त्या आठवणी आगरी कोळी बांधवांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. नवी मुंबईमध्ये सिडको व महापालिकेविरोधात गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरूणाई नारायण नागू पाटील व दि. बा. पाटील यांचा आदर्श समोर ठेवून लढा देत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई केल्यानंतर रस्त्यावर उतरलेली तरूणाई त्यांच्यावर अविश्वास ठराव आल्यानंतरही मुंढे हटाव मोहिमेमध्ये अग्रेसर होती. प्रकल्पग्रस्तांचा मुंढे हटाव मोहिमेमध्येही सहभागशहरातील प्रकल्पग्रस्त तरूणांनी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हक्कांसाठी लढा सुरू केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई सुरू केल्यामुळे यापूर्वी नवी मुंबई बंद करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून मंदिरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर व प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरही कारवाई केली जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आयुक्तांच्याविरोधात अविश्वास ठराव आल्यानंतर जनजागृती करण्यामध्येही प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा होता. या तरूणाईसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इतिहास प्रेरणादायी ठरला. शेतकरी संपाच्या आंदोलनाची वैशिष्ट्ये २७ आॅक्टोबर १९३३ रोजी २५ गावातील शेतकऱ्यांनी संप पुकारला१९३४ - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनस्थळी भेट दिली२५ आॅगस्ट १९३५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चरीला भेट दिली. तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट देवून चर्चा केली१९३९ मध्ये शेतकऱ्यांनी संप मागे घेतला. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे चाललेला एकमेव संप
पहिल्या शेतकरी संपाचा स्मृतीदिन
By admin | Updated: October 27, 2016 03:21 IST