सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: मित्रांसोबतची पावसाळी सहल तिघांच्या जीवावर बेतली. कोपरखैरणे परिसरातील १० मित्र माथेरानला गेले होते. या सहलीचा शेवट सुमित चव्हाण (१६), आर्यन खोब्रागडे (१९) व फिरोज शेख (१९) यांच्या आयुष्याच्या शेवटाने होईल, याची कल्पना कोणाला नव्हती. ही दुर्दैवी घटना रविवारी माथेरानच्या शार्लोट तलावात घडली.
फिरोज हा घणसोली येथे तर सुमित व आर्यन कोपरखैरणे सेक्टर ५ मधील एकाच सोसायटीत राहत होते. त्याच परिसरातले १० जण माथेरानला सहलीला गेले होते. परतीचा प्रवास करताना पाय धुण्यास ते शार्लोट तलावाकडे गेले. तेथे एक जण डोहात पडला. त्याच्या मदतीला गेलेले पाच जण डोहात पडले. यातील दोघे बाहेर आले. सुमित, आर्यन व फिरोज हे बुडाले.
शिक्षणाची कास धरली; पण...फिरोज हा मॉडर्न कॉलेजमध्ये बीएमएस शिकत होता, तर आर्यन एक वर्षापासून पुण्यात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो घरी आला होता. नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या सुमितच्या वडिलांना अर्धांगवायू आहे. आई व मोठ्या भावावर कुटुंबाचा भार आहे. तिघांच्याही कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. परिवाराचा आधार बनण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली होती. यातून ते भविष्यात यशाचे शिखर गाठून कुटुंबाचा उद्धार करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती.