लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांचा फटका सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना बसला. वाशी ते पनवेल दरम्यान महामार्गावर प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी दोन तास वेळ लागत होता. खड्डे व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे चक्का जाम झाले होते. दिवसभर सुरू असलेल्या या समस्येमुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांनी शनिवार व रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दोन दिवसांच्या पिकनिकचे आयोजन केले आहे. लोणावळा, अलिबाग, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील धबधब्यांवर अनेकांनी सहलीचे आयोजन केले होते; परंतु सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे व रखडलेल्या कामांमुळे नियोजनाचे १२ वाजले. वाशीवरून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पहाटेपासूनच वाहतूककोंडी होऊ लागली होती. दुपारनंतर वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. दहा मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी चक्क दोन तास लागत होते. यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. वाहनांचा कर्णकर्कश आवाजांमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी छोटी वाहने पामबिच रोडवरून वळविली होती; परंतु यानंतरही कोंडी सुटत नव्हती. अनेक चालकांनी सानपाडा सिग्नलवरून रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु यामुळे रेल्वे स्टेशनबाहेरही वाहतूककोंडी झाली होती. तुर्भे पुलावर व पुलाखालीही चक्का जामची स्थिती निर्माण झाली होती. सीबीडी, खारघरमधील सर्व्हिस रोड व अंतर्गत रोडवरही वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला होता. प्रचंड वाहतूककोंडीमुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्ग आहे की खड्डे मार्ग, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. खारघरमध्ये पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्याबरोबरच रोडवरील खड्डे स्वत:च बुजविण्यास सुरुवात केली होती. दिवसरात्र रोडवर उभे राहून पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन अजून किती दिवस सायन-पनवेल महामार्गावरील ठेकेदारास पाठीशी घालणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. ठेकेदारावर कारवाई करासायन-पनवेल टोलवेज कंपनीने महामार्गावरील खड्डे बुजविण्यास नकार दिला आहे. रखडलेले कामेही पूर्ण केली जात नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही दाद दिली जात नसल्याने या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. टोल बंद करावासायन-पनवेल महामार्गावरील रखडलेली कामे जोपर्यंत पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत खारघर टोलनाका बंद करावा. रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, प्रवासी कायदा हातात घेऊन टोलवर तोडफोड करण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने योग्य दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. असंतोष वाढला महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. किती दिवस त्रास सहन करायचा? असा प्रश्नही प्रवासी विचारू लागले आहेत. महामार्गाचे रूंदीकरण वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केले आहे की वाहतूककोंडी वाढविण्यासाठी केले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईवरून लोणावळ्याकडे निघालेल्या संतोष पवार यांनी उपस्थित केला आहे.वाहनचालकांची कसरतवाशी ते कळंबोलीपर्यंत जाण्यासाठी महामार्गावरून जास्तीत जास्त १० ते १५ मिनिटे वेळ लागतो; परंतु खड्ड्यांमुळे एवढे अंतर कापण्यासाठी चक्क दोन तास लागत होते. एवढ्या वेळेमध्ये पुण्यापर्यंत पोहोचलो असतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करू लागले होते. एकाच जागेवर थांबावे लागल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. खड्ड्यांमध्ये अडकली वाहनेमहामार्गावरील खड्ड्यांनी शनिवारी स्पीडबे्रकरचे काम केले. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने त्यामध्ये आदळत होती. अनेक मोटारसायकलचा अपघात झाला. खड्ड्यांमुळे वाहनांची गती कमी होऊन वाहतूककोंडीमध्ये भरच पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागही हतबलमहामार्गावरील खड्डे व इतर दुरूस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहेत; परंतु खड्ड्यांची व्याप्ती प्रचंड असून रखडलेले भुयारीमार्ग, पादचारी पूल व रूंदीकरणाची कामे यामुळे वाहतूककोंडी वाढतच चालली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही ठेकेदारापुढे हतबल झाला असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. कळंबोलीतील रस्ते पाण्यातगेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने कळंबोली वसाहतीतील रस्ते पाण्यात गेले आहेत. पावसाळी नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्याने विकसित केलेल्या सेक्टरमध्ये पाणी भरले आहे. कळंबोली वसाहत तीन मीटर खाली असल्याने कमी पावसातही सखल भागात पाणी साचते. २००५च्या महापुरानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता चॅनेल तयार करण्यात आले. त्याचबरोबर नवीन सेक्टर विकसित करताना भराव करण्यात आला. यंदा मान्सूनपूर्व नालेसफाई व्यवस्थित करण्यात आली नाही. त्यामुळे कळंबोली आणि रोडपालीच्या अंतर्गत रस्त्यावर पाणी साचत आहे. सेक्टर-१४ येथील ज्ञानमंदिर शाळेमागे रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते. सेक्टर-४मध्ये सखल भागात पाणी साचत आहे. पालिकेच्या नव्या इमारतीचे स्लॅब कोसळलेदोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावण्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्र वारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पनवेल महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील स्लॅब कोसळले. एक दिवसआधीच हे स्लॅब टाकण्यात आले होते. जोरदार पावसामुळे हे स्लॅब कोसळले. पनवेल महापालिकेच्या तीन मजल्यांपैकी दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. या नवीन इमारतींमध्येच महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, विविध समित्यांच्या सभापतींची दालने उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शुक्र वारी झालेल्या या घटनेनंतर पुन्हा नव्याने स्लॅबच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.९ वृक्ष कोसळलेनवी मुंबईलाही दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. पावसामुळे शहरात ९ ठिकाणी वृक्ष कोसळले. ऐरोली सेक्टर ८,नेरूळ सेक्टर ६, वाशी सेक्टर ९, ऐरोली सेक्टर १७, वाशी सेक्टर ९, सीबीडी सेक्टर ११, नेरूळ सेक्टर ४४ व सीवूड सेक्टर ३८मध्ये वृक्ष कोसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वृक्षांच्या फांद्या बाजूला केल्या. सानपाडा, कोपरखैरणे व घणसोली भुयारी मार्गामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
सायन-पनवेल महामार्गावर महाकोेंडी
By admin | Updated: July 16, 2017 03:00 IST