कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिके च्या बहुतांश शाळांना पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली असताना त्यात आता पूर्वेकडील संत रोहिदास प्राथमिक विद्यालयाचीदेखील भर पडली आहे. येथील घटती पटसंख्या पाहता ही शाळादेखील शेवटच्या घटका मोजत आहे.काटेमानिवली परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्य:स्थितीला येथील विद्यार्थी पटसंख्या अवघी ३८ इतकी आहे. इयत्तांच्या पटसंख्येनुसार पहिली आणि दुसरीत ३, तिसरीत २, चौथीत ७, पाचवीत ४, सहावीमध्ये ८ तर सातवीत ११ अशी विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणी बालवाडी असून येथील मुलांची संख्या १० आहे. २००८ च्या आसपास विद्यार्थी पट हा दीडशेच्या आसपास होता. सध्या तो ३८ वर येऊन ठेपला आहे. विद्यार्थी पटसंख्या किमान २० असणे बंधनकारक आहे. या शाळेतील पटसंख्या ३८ वर आल्याने शाळेला अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. परंतु, यावर उपाय म्हणून शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणातून यंदा ८ ते १० विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचा दावा येथील शिक्षक करीत आहेत. शाळेच्या एक किमी परिसरात अन्य दुसरी शाळा असू नये, असा नियम आहे. मात्र, या नियमाकडे येथेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिसरात ९ ते १० खाजगी शाळा असून याचा फटका पटसंख्येला बसला आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही जण बहुभाषिक आहेत. शाळेची स्थापना १९४७ सालची असून नूतनीकरण २००९ मध्ये केले. वर्गखोल्या ६ आहेत. परंतु, येथे शिक्षक दोनच असल्याने इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा इयत्ता एकत्रितपणे दोन खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
‘त्या’ शाळेलाही अखेरची घरघर
By admin | Updated: October 1, 2015 01:40 IST