पनवेल : चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही, अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो कायदा संसदेत केला, त्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) संभ्रम निर्माण करून काही राजकारण्यांनी खेळ मांडला आहे. दिल्लीतील दंगल त्याचाच परिणाम आहे, असे रोखठोक प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे केले.सहस्रबुद्धे म्हणाले, दिल्लीत जे घडले ते विचारी माणसाला चिंता करायला लावणारे आहे. हत्या, दंगल, जाळपोळ, जीवित व मालत्तेचे नुकसान होणे, ही लज्जित करणारी घटना आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी दंगल नेमकी कुणी घडवली? गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्माला भोसकून मारले जाते, त्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून देण्यात येतो, इतकी अमानुषता येते कुठून? हा प्रश्न पडेल, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. या कायद्याबाबत भीती का, तर अनेक वर्षांपासून मतपेटीचे राजकारण काही मंडळी करीत आली आहेत आणि यातूनच असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नागरिकत्व कायदा’ या विषयावर खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यलयात झालेल्या व्याख्यानाला आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ. सुहास हळदीपूरकर, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, संतोषी तुपे, डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष कीर्ती समुद्र आदी उपस्थित होते.
सीएएबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न- डॉ. विनय सहस्रबुद्धे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:24 IST