नवी मुबई: खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जणार्या हिरानंदानी उड्डाणपुलाखाली सिडकोने आकर्षक चौक उभारला आहे. मात्र नियमित डागडुजीअभावी सध्या चौकाची दुरवस्था झाली आहे. तसेच सुशोभिकरणाचे काम अर्धवट अवस्थेत पडून असल्याने या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे रहिवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी याच हिरानंदानी उड्डाणपुलाखालील चौकातून जावे लागते. त्यामुळे या चौकात वाहने व पादचार्यांची नेहमीच वर्दळ असते. हा चौक अगदी सायन-पनवेल महामार्गालगतच असल्याने याच भागात बाहेरगावी जाणार्या खासगी बसेसचे थांबे आहेत. त्यामुळे या चौकाजवळ नेहमीच खासगी प्रवासी वाहनांचा तळ दिसून येतो. त्यामुळे या चौकाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. असे असले तरी सिडकोने या चौकाच्या सजावटीच्या कामाकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले आहे. चौकातील शिल्प मोडकळीस आलेले आहेत. तसेच तारेचे कुंपण सुध्दा गायब झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणाला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या सर्व परिस्थितीमुळे खारघरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या चौकाला अवकळा प्राप्त झाली आहे. या चौकाची तातडीने डागडुजी करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
हिरानंदानी चौकाकडे सिडकोचे दुर्लक्ष
By admin | Updated: May 12, 2014 05:53 IST