उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. यामुळे २४ तास पाणी सेवा देण्याचे स्वप्न भंगले असून भरारी पथकही कागदावरच आहे. उल्हासनगरात पाणीटंचाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभागनिहाय पालिका अधिकारी यांच्यासह नगरसेवक, नागरिकांसोबत बैठका घेवून टंचाईतून मार्ग काढण्यायचा प्रयत्न चालविका आहे. यानुसार पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड, विभागाचे कार्यकारी अभिंयता कलई सेलवन, बी.एस. पाटील, उपमहापौर पंचशिला पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाणीटंचाईमुळे दबंग नगरसेवक वॉलमेनला हाताशी धरून पाणी पळवित आहेत. पाणी पळवापळवी करणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशान यांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्कालिन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी २४ तास सेवा व भरारी पथकाची संकल्पणा मांंडली होती. काही महिने ती सुरू झाली होती. मात्र त्यानंतर ही संकल्पना गायब होऊन भरारी पथकही दिसेनासे झाल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)
पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा
By admin | Updated: December 24, 2015 01:39 IST