नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) क्षेत्रात वावरणारे पक्षी आणि विमानळावर ये-जा करणाऱ्या विमानांच्या सुरक्षिततेवर ‘बर्डगार्ड इंडिया’ ही संस्था वॉच ठेवणार आहे. विमानतळ परिसरात आढणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातींच्या हालचाली आणि विमाने या दोघांसाठी परिसरातील आकाश सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने दिल्याची माहिती नॅट कनेक्ट फाऊंडेशने दिली.
वन्यजीव धोक्याच्या व्यवस्थापनासाठी एनएमआयएने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेला (आयसीएओ) ही माहिती दिली आहे. यात कंपनीने स्पष्ट केले आहे की, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएचएनएस) ने स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी विमानाच्या उड्डाणमार्गाच्या खूप खाली उडतात. यामुळे विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार आता पर्यावरण अनुपालन अहवालांचा भाग म्हणून एनएमआयएने बीएनएचएसच्या अंतिम शिफारसींनुसार कंपीनीने जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यास वचनबद्धता दर्शविली आहे.
नॅट कनेक्ट फाऊंडेशचे संचालक बी. एन. कुमार यांनी कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून फ्लेमिंगोसारख्या पाणथळ पक्ष्यांचे घर असलेल्या नवी मुंबई शहरातील सर्व प्रमुख पाणथळ जागा संवर्धन करण्यास मदत हाेणार असल्याचा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला आहे. तसेच या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींसह पक्षीप्रेमींनी स्वागत आनंद व्यक्त केला. या निर्णयाप्रमाणे डीपीएस तलावास सरकारने राखीव संवर्धन क्षेत्र घोषित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आवाहनही बी. एन. कुमार यांनी केले आहे.
१३ किमीपर्यंत सर्वेक्षण एनएमआयएने सांगितले की, त्यांनी एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेस एअरोड्रोमनुसार वन्यजीव धोका व्यवस्थापन कार्यक्रम विकसित केला असून यात सक्रिय आणि निष्क्रिय पद्धती आणि नियमित वन्यजीव निरीक्षणासह अमलात आणायच्या विशिष्ट उपाययोजनांची रूपरेषा आहे. विमानतळाच्या आत आणि आसपासच्या सर्व ऋतूंमध्ये १३ किमी त्रिज्यापर्यंत सर्वेक्षणासाठी ‘बर्डगार्ड इंडिया’ ही बाह्य संस्थादेखील नियुक्त केली आहे.
या पाच बाबींचा अभ्यास‘आयसीएओ’ला दिलेल्या ‘एनएमआयए’च्या अहवालात नवी मुंबई विमानतळाभोवती आढळलेल्या विविध पक्ष्यांच्या प्रजातीचे अधिवास आणि खाद्य वर्तनांवर अभ्यास करण्यात येणार आहे. या अंतर्गत पक्षांचे पृष्ठभागावरील खाद्य, डायव्ह फीडर, हवाई शिकारी, जमिनीवरील शिकारी आणि किनाऱ्यावरील खाद्य या पाच प्रकारांचे वर्गीकरण करून अभ्यास सुरू केल्याचे विमानतळ कंपनीने म्हटले आहे. एकूण यामुळे पक्षांसह विमानाच्या सुरक्षेसाठी दिलासा मिळणार आहे.