भिवंडी : गेल्या काही वर्षापासून मुलभूत सुविधांकडे प्रशासन व लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष आणि महानगरपालिकेतील वाढता भ्रष्ट कारभार या विषयी नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली असून या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून महानगरपालिका बरखास्त करावी म्हणून शहरातील नागरिकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या १७ मुद्द्यावर समाजसेवक शरद पाटील यांनी ९ एप्रिल २०१३ रोजी उच्च न्यायालयात तक्रार केली होती. तसेच महानगरपालिका बरखास्त न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याकडे तक्रारकर्त्यांचे वकील अमित घरटे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. या बाबत ७ सप्टेंबर २०१५रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती ए.एस. ओक व न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांच्या खंडपिठाने महानगरपालिकेच्या वकीलांकडे पूर्तता अहवाल मागविला. तसेच पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार असल्याचे जाहिर केले. (प्रतिनिधी)
भिवंडी महानगरपालिका बरखास्तीच्या मार्गावर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2015 00:16 IST