ठाणे: पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत. त्यासाठी घेतलेल्या ११० कामांवर दोन हजार ९१७ मजूर काम करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला आहे. उत्पादन अत्यल्प होणार असल्यामुळे शेतकरी त्यावर अधिक खर्च करण्यास धजावत नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ते ग्रामपंचायतींसह विविध शासकीय विभागाद्वारे नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवर जात आहेत. एप्रिलपासून या कामांवरील मजुरीतही वाढ झाली आहे. या आधी केवळ १६५ रूपये मिळत असत. परंतु, आता १८१ रूपये प्रतिदिन अशी मजुरी मिळत आहे. त्यामुळे या कामांवर मजूर वळताना दिसत आहेत.या कामांवर हजर राहणाऱ्या मजुरांचे वेतन १५ दिवसाच्या आत त्यांच्या बँकेसह पोस्टातील खात्यावर जमा होत असल्याचा दावाही केला जात आहे. संबंधितानाकडून काही वेळा चुकीचा खातेक्रमांक टाकल्या जात असल्याची समस्या निदर्शनात आलेल्या आहेत. यामुळे दुसऱ्याच्या खात्यावर मजुरी जमा होत असल्याचे तक्रारी अधूनमधून येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन सदरची मजुरी पुन्हा संबंधित मजुराच्या खात्यावर वळविली जाते. या प्रक्रियेला मात्र काही दिवसांचा विलंब होतो.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींद्वारे ६२ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर एक हजार ५८२ मजूर कार्यरत आहेत. याशिवाय विविध यंत्रणाव्दारे ४८ कामे सुरू केलेली आहेत. त्यावर एक हजार ३३५ मजूर कार्यरत आहेत. यापैकी भिवंडी तालुक्यातील २० कामांवर ३०० मजूर आहेत, शहापूर ३८ कामे ११२८ मजूर असून कल्याणमध्ये सात कामांवर १११,अंबरनाथच्या सात कामांवर १६८, मुरबाडच्या ३८ कामांवर सर्वाधिक एक हजार २१० मजूर कार्यरत आहेत.
नरेगाच्या कामांवर २,९१७ मजूर
By admin | Updated: October 1, 2015 01:43 IST