लेखनातून महिलांनी ठाम भूमिका घ्यावी (भाग १)
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
- मुक्ता मनोहर : लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळेला प्रारंभ
लेखनातून महिलांनी ठाम भूमिका घ्यावी (भाग १)
- मुक्ता मनोहर : लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळेला प्रारंभ नागपूर : स्त्रिया आता मोकळेपणाने लिहू लागल्या आहेत, पण त्यात अजूनही पुरुषप्रधान मानसिकताच आढळते. जागतिकीकरणाच्या या काळात आपली संवेदना जपून अभिव्यक्त होणे कठीण आहे. अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यांना भिडण्याची प्रगल्भताही गरजेची आहे. अशा काळात आपण नेमक्या कुठल्या बाजूने आहोत आणि का आहोत, ते ठामपणे सांगण्याचे धाडस लेखिकांना करावे लागेल. यासाठी महिलांनी ठाम भूमिका घेण्याची गरज पुण्याच्या नग्नसत्यकार मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, माहेर संस्था आणि आकांक्षा प्रकाशनाच्यावतीने वैदर्भीय लिहित्या महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ही कार्यशाळा बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी, डॉ. कविता शनिवारे, कंुदाताई विजयकर, अरुणा सबाने प्रामुख्याने उपस्थित होत्या. मुक्ता मनोहर म्हणाल्या, लिहायला आवडते म्हणून लिखाण सुरू राहायला हवे. सर्वच लेखनप्रकार हाताळता यावे, असे मला वाटायचे पण ते शक्य होत नाही. अनुभव न घेता लिहिणे योग्य नाही. उदारीकरणात प्रचंड उलथापालथ समाजात होते आहे. त्यात अभिव्यक्त होणे आणि संवेदना जपणे कठीण होत असताना ही प्रक्रिया स्त्रियांना लेखनाची ऊर्जा देणारी आहे. स्त्रियांनी राजकीय लेखनाकडेही वळले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. कुंदाताई विजयकर म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीची कथा आणि व्यथा वेगळी आहे. स्त्री तिच्या भावना मनातच ठेवते. पण तिच्या भावना साहित्यात आल्या पाहिजे. अनेक बाबी मनात घर करून राहतात. अशा उपक्रमातून त्या लिहिण्याची उर्मी जागृत होते. त्यामुळेच ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी मांडले. गिरीश गांधी म्हणाले, वेगळ्या वाटेवर चालणारे लोकच काहीतरी वेगळे करू शकतात. पुरुषप्रधानतेविषयी बरेच काही बोलून झाले. आता महिलांनीही स्वत:ला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध केले आहे. सामान्य माणूस आणि त्याचे जगणे लिखाणात असावे. यातूनच स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळतील, असे गांधी यांनी सांगितले. डॉ. कविता शनिवारे म्हणाल्या, जीवनात संवेदनशीलता हा दागिना आहे. तोच लेखनाचा आधार आहे. लेखन हे गरिबाच्या घरासारखे आहे. एक तास बरसते आणि दोन तास ठिपकते. लिखाण मासोळीसारखे सैरभैर होते. आपापल्या क्षमता ओळखून स्त्रियांनी लिहिले पाहिजे.