ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २० - दिल्लीत सत्तेवर यायचे की नाही यावर निर्णय घेण्यासाठी आपने पुन्हा एकदा दिल्लीकरांचा कौल घेण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र याविषयी पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळाल्याने दिल्लीतील आपच्या आमदारांना अस्वस्थता पसरली आहे. दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणूक झाल्यास आपला बहुमत मिळणर नाही व भाजपाच सत्तेवर येईल अशी भिती आपच्या आमदारांना वाटत आहे. त्यामुळे आपच्या बहुसंख्य आमदारांनी दिल्लीत सत्ता स्थापन करावी अशी मागणी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली होती. काँग्रेस किंवा भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी असे आपच्या आमदारांचे म्हणणे होते. आमदारांच्या मागणीनंतर पक्षाच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेवर विचारमंथन सुरु केल्याचे समजते. अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जनमताची चाचणी घेण्याची तयारी आपने सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आपने जनमत चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे की नाही यासाठीही केजरीवाल यांनी दिल्लीकरांचा कौल घेतला होता. तर वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यासाठीही त्यांनी वाराणसीकरांची मत जाणून घेतली होती.