औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे मसनतपूर, चिकलठाणा येथील घर बळकावणाऱ्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुंदराबाई मच्छिंद्र वाघ, संदीप मच्छिंद्र वाघ, लक्ष्मीबाई रमेश म्हस्के, मच्छिंद्र दामोदर वाघ, संजय रमेश म्हस्के (सर्व रा. मसनतपूर, अशोकनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फकिरा सखाराम साळवे यांचे मसनतपूर येथे स्वत:च्या मालकीचे घर आहे. कामधंद्यानिमित्त ते बाहेरगावी गेल्यामुळे घर बेवारस होते. आरोपी सुंदराबाई यांनी त्या घराचे मालक असल्याचे दाखवून ते पतीच्या नावावर केले. त्यानंतर त्यांच्या पतीने त्या घराचे खरेदीखत संजय म्हस्के यांच्या नावे करून दिले. हा प्रकार घरमालक साळवे यांना समजताच त्यांनी आरोपींविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले होते. साळवे यांनी न्यायालयात धाव घेतली असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचेआदेश एमआयडीसी सिडको पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी २३ जुलै रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तडवी यांनी दिली. आरोपींनी घर नावे करताना घराच्या मालमत्ताकराची पावतीही स्वत:च्या नावे तयार करून घेतली होती.
घर बळकावण्याचा प्रयत्न; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST