बोरगाव वैराळे: बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर येऊन शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही.बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरात २०१३च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर आला. यामध्ये शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके जमीनदोस्त झाली, तसेच शेतीमधील सुपीक मातीही वाहून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्याचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागामार्फत करण्यात आल्यानंतर केंद्रीय समितीकडूनही शेतीची पाहणी करण्यात आली होती; परंतु या घटनेला वर्ष होत आले तरी, नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. बाळापूर तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरातील खरिपाची पिके मोर्णा व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामध्ये २०१२च्या ऑगस्ट आणि सप्टेबरमध्ये पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत करण्यात आले होते; परंतु त्याची नुकसान भरपाईसुद्धा आजवर मिळाली नाही. त्यानंतर २०१३ला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, कपाशी, तूर, मूग, उडीद, तीळ ही सर्व पिके जमीनदोस्त झाली. शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेली. या शेतीला पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकर्यांना १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. शासनाने खरडून गेलेल्या शेतीला हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले; मात्र ही मदत अद्यापही शेतकर्यांना मिळाली नाही.
शेती खरडून गेलेल्यांना वर्षभरानंतरही आर्थिक मदत नाही
By admin | Updated: May 27, 2014 19:22 IST