मध्य प्रदेशमधील धरनावदा गावामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धरनावदा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीत आज दुपारी गाईचं एक वासरू पडलं. विहिरीत वासरू पडल्याचं पाहतात गावकऱ्यांना या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, काही धाडसी तरुण एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले. दरम्यान, आपण या वासराला सहज बाहेर काढू असे त्यांना वाटले होते.
मात्र बऱ्याच जुन्या असलेल्या या विहिरीमध्ये विषारी वायू भरलेला होता. त्यामुळे खाली उतरलेले तरुण एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले. परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली की बाहेर उभ्या असलेल्या लोकांना त्यांच्या मदतीसाठीही काही करता आले नाही. ही वार्ता संपूर्ण गावात वेगाने पसरली. अखेरीस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत पाच तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथक उपस्थित होते. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, दोऱ्या आणि इतर उपकरणांसह मदत कार्य सुरू केले. मात्र विहिरीत भरलेल्या विषारी वायूमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. मदत कार्यामध्ये स्थानिकांकडूनही मदत घेतली जात आहे.