थोडक्यात नागपूर
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
व्हीसीएच्या सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण
थोडक्यात नागपूर
व्हीसीएच्या सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशन, क्रिकेट स्टेडियम, जामठा येथे २१ कर्मचारी सातत्याने कार्यरत होते. या कामगारांना प्रस्थापित कायद्यानुसार कुठल्याही सुविधा आणि वेतन देण्यात येत नव्हते. मालकांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यात येत होती. यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कामगारमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अनेकदा निवेदने देण्यात आली. कामगारांना १२ तास काम करण्याच्या वेतनाचा एरियर्सही देण्यात आला नाही. त्यानंतर दुसऱ्याच कंपनीला कंत्राट देऊन सुरक्षा रक्षकांवर बेरोजगारीची पाळी आणण्यात आली. याविरोधात कर्मचाऱ्यांनी रोजंदारी मजदूर सेनेच्या नेतृत्वात जामठा चौक येथे साखळी उपोषणाला प्रारंभ केला. जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे, त्यांना अतिरिक्त कार्यकाळाचे वेतन देण्यात यावे, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नवीन कंत्राट रद्द करण्यात यावे, सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. आंदोलनात वसंता हिवरकर, देवराव झाडे, कमला शेंडे, मंजुषा चौहान, सिंधु आष्टनकर, बेबी झगडे, अर्चना कोपरे, पूनम पोटफोडे, गीता कामडी, कविता मेश्राम, शांता पुरी, मारोती धोटे, विनोद सरनाईक, प्रदीप हिवसे, चंदू गिरसावळे, हरीश कोहळे, कमलेश चव्हाण, महेंद्र बागडे, केशव बोरकर आदींचा सहभाग आहे. -----नागपुरात चित्रनगरी करण्यासाठी महापौरांना निवेदननागपूर : सारथी ही संस्था गेली अनेक वर्षे नागपुरात चित्रनगरी व्हावी यासाठी प्रयत्न करते आहे. ही मागणी सारथीने सर्व स्तरांवर लावून धरली आहे. अजय देवगण आणि अक्षय खन्ना नागपुरात आले असता त्यांनीही ही मागणी रास्त असल्याचे सांगितले. याशिवाय मराठी चित्रपटातील अभिनेते गिरीश ओक, स्मिता तळवलकर, वर्षा उसगावकर, किशोर प्रधान, विलास उजवणे यांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. मोहन जोशी यांनीही तसे निवेदन दिले आहे. महापालिकेनेही यात रस दाखविला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणात कॅबिनेटची मंजुरीही लाभली आहे. सारथीचे सदस्य अमर वझललवार, डॉ. अनिरुद्ध वझलवार, विद्याधर सहस्त्रबुद्धे, राजू गेडाम यांनी महापौरांची भेट घेऊन नागपुरात चित्रनगरी करण्याबद्दल प्रवीण दटके यांना निवेदन दिले आहे. येथे चित्रनगरी झाल्यास हजारो कोटींची उलाढाल येथे होईल आणि पर्यायाने राज्याला आर्थिक उत्पन्न मिळेल, विकासाला चालना देण्यासाठी चित्रनगरी गरजेची आहे. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी सारथीला दिले आहे.