मोदींनी ठरविली ज्योतिषवाणी खोटी, लाटेत वाहून गेले ग्रह-तार्यांचे अडथळे पुणे : लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, देशाचे सरकार त्रिशंकु असेल, मोदी पंतप्रधान होणार नाहीत इथपासून ते नवे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर येईल, अस्थिर सरकारमुळे मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील अशा प्रकारची भाकिते करणार्या ज्योतिषांची वाणीच मतदारांनी बंद केल्याचे चित्र देशात पहायला मिळत आहे. लोकसभेच्या मतदानापुर्वी व काही टप्प्यांचे मतदान सुरु झाल्यानंतर राज्यातील विविध भविष्यवेत्त्यांनी लोकसभेची कुंडली मांडली होती. त्यानुसार मोदी यांचे ग्रहमान चांगले नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. थोडक्यात मोदी पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचे भाकित वर्तविण्यात आले होते. भाजपने जरी सर्वाधिक जागा मिळविल्या तरी त्यांना मित्र पक्षांच्या सहाय्यानेच सरकार स्थापन करावे लागले. येणारे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरच येईल. त्रिशंकु सरकार असल्याने दोन-तीन वर्षांत देशाला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसचे स्थिर सरकार येईल. देशात झालेल्या मतदानाचे विविध टप्पे, कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच ज्येष्ठ नेत्यांची व देशाचे ग्रहमान पाहून असे अंदाज वर्तविण्यात आले होते. विविध भविष्यवेत्त्यांच्या अंदाजात परस्पर विरोधाभास असला तरी देशाचे सरकार त्रिशंकु असेल, त्यामुळेच मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे काही समान मुद्दे त्यात होते. ज्योतिषांच्या भविष्यानुसार भाजपला १५० ते २२५, कॉंग्रेसला ११५ ते १२५, बहुजन समाज पक्ष १६ ते १८, समाजवादी पक्ष १८ ते २०, जनतादल युनायटेड १६ ते १८ अशा पक्षांच्या संभाव्य जागांचे अंदाज देण्यात आले होते. राज्यात कॉंग्रेसला १२ ते १४, राष्ट्रवादी ८ ते १०, भाजप १२ ते १४, शिवसेना १० ते १२ अशी जागांची संख्या देण्यात आली होती. तसेच या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खाते उघडेल असे देखील सांगण्यात आले होते. मात्र भविष्यवेत्त्यां्चे सर्व अंदाज मतदार राजाने फोल ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्योतिषांच्या भविष्यावर शनी वक्री
By admin | Updated: May 17, 2014 21:50 IST