- विकास झाडे
नवी दिल्ली : कोरोनाची स्थिती आवाक्यात असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. सोमवारपासून ५० टक्के आसन क्षमतेने मेट्रो धावतील, मॉल सम-विषमप्रमाणे सुरू करण्यात येत आहेत. शिवाय सरकारी कार्यालयात ५० टक्के मनुष्यबळ उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे हळूहळू कमी होत आहेत. आज ४०० प्रकरणे आहेत आणि केवळ ०.५ टक्के संसर्गाचे प्रमाण शिल्लक आहे. दिल्लीत लॉकडाऊन चालू राहील; परंतु बऱ्याच सवलती दिल्या जात आहेत. सर्व बाजारपेठा आणि मॉल सम- विषम तत्त्वावर उघडतील. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत क्रमांकानुसार दुकाने उघडतील. दिल्लीतील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या आठवड्यात दिल्लीत काय खुले आणि बंद राहील याबाबत त्यांनी माहिती दिली; परंतु कोरोना प्रकरणे वाढली तर पुन्हा लॉकडाऊन कडक केले जाऊ शकते.