बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ जण जखमी झाले आहेत. जखमींना बंगळुरूमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुःखद घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींनी अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, "बंगळुरूमधील ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद क्षणी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो."
दरम्यान, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे आरसीबीने हा ऐतिहासिक विजय घरच्या मैदानावर बंगळुरूत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचा संघ आज दुपारी अहमदाबादहून बंगळुरूत दाखल झाला.
आरसीबी संघ बंगळुरूला पोहोचला, तेव्हा सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधानसभेत गेला. येथे सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विधानसभेबाहेर हजारो चाहते जमले होते. आपल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी बंगळुरू विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि कर्नाटक विधान सौधाच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. सुरक्षतेच्या कारणास्तव आरसीबीची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आणि त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चिन्नास्वामी स्डेडियमध्ये आयोजित करण्यात आला. विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर आरसीबी संघ बसने चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला. मात्र, तिथेही चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.