गणेशोत्सवाला रितसर परवानगी घ्या रवींद्र सेनगावकर : रस्त्यावर 25 टक्के पेक्षा जास्त मंडप न मारण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 23:37 IST
सोलापूर :
गणेशोत्सवाला रितसर परवानगी घ्या रवींद्र सेनगावकर : रस्त्यावर 25 टक्के पेक्षा जास्त मंडप न मारण्याचे आवाहन
सोलापूर : गणेशोत्सव साजरा करत असताना संबंधित सार्वजनिक मंडळांनी रितसर सोलापूर महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावर उभारण्यात येणारा मंडप हा 25 टक्के पेक्षा जास्त असू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बालासिंग रजपूत, पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणाले की, गणेशोत्सव हा मोठा सण असून, सार्वजनिक मंडळांनी तो चांगल्या पद्धतीने साजरा करावा. उत्सवादरम्यान मंडपात दोन बेस व दोन स्पिकर लावण्यात यावे. लोकांना त्रास होईल असे डॉल्बी लावू नये, आवाज 75 डेसिबलच्यावर नसावा. वर्गणी गोळा करताना लोकांच्या खिशात हात घालू नका. मिरवणुकीत गुलालाचा जास्त वापर करू नका. मद्यप्राशन करून मिरवणुकीला गालबोट लावू नका. मंडळाच्या प्रत्येक पदाधिकार्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मोठय़ा मूर्ती न घेता छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे सेनगावकर म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना संबंधित मंडळांची धर्मादाय आयुक्त व पोलिसांकडे नोंद असली पाहिजे, अन्यथा बेकायदा मंडळ गृहीत धरले जाईल. रस्त्यावर थाटण्यात येणारा मंडप हा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. रितसर परवान्याला पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल. उत्सवात फटाके फोडून शांततेचा भंग करू नये. गणपती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य पाण्यात न टाकता ते कुंडीत टाकावे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होणार नाही. पाण्यात विरघळतील अशा मूर्ती मंडळांनी घ्याव्यात, असे आवाहन यावेळी आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन सुनीता औसेकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)चौकट..दहशतवादी कारवाईच्या धर्तीवर सतर्क राहा..0 दहशतवादी कारवाईच्या धर्तीवर मंडळांच्या पदाधिकार्यांनी सतर्क राहिले पाहिजे, अनोळखी व्यक्ती, वस्तू यावर लक्ष ठेवावे. 0 मंडळांमध्ये जुगार चालणार नाही याची काळजी घ्या अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. 0 सिद्धेश्वर तलाव, कंबर तलाव व विहिरींचे पावित्र्य राखावे, निर्माल्य कुंडीत टाकून महापालिकेला सहकार्य करा. 0 आकडे टाकून वीज घेऊ नका, वीज वितरण कंपनीकडे मीटरची मागणी करा, कनेक्शन मिळून जाईल. 0 मशिदीच्या ठिकाणी गोंधळ न घालता शांततेत मिरवणूक काढावी, गुलालाचा जास्त वापर करू नये. 0 गणेशोत्सवदरम्यान बकरी ईद येत असून दोन्ही समाजाने एकमेकांच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये.0 मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार असून अनुचित प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल आदी कडक सूचनाही यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केल्या. यावेळी अशोक मुळीक, राजन जाधव, सुनील रसाळे, नगरसेवक देवेंद्र भंडारे आदींनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या. चौकट..स्मार्ट सिटीचा संदेश द्या : काळम-पाटीलगणेशोत्सवादरम्यान मंडळांनी सजीव किंवा निर्जीव देखाव्यांमध्ये स्मार्ट सिटीचा संदेश देऊन जनजागृती करावी. मंडळाच्या ठिकाणी पेटी करून त्यामध्ये भाविकांकडून स्मार्ट सिटी संदर्भात सूचना करण्याचे आवाहन करावे. आपण शर्यत जिंकलो पण स्मार्ट सिटीचा टप्पा केव्हा मिळणार हे पाहावे लागणार आहे. उत्सव काळात मनपा मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी केले.