नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेचेही राजकारण सुरु केल्याबद्दल काँग्रेसने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आणि भारतातील नागरिकांच्या संतापाचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी जणू काही पाकिस्तानात निवडणूक लढवायला निघाल्याच्या आविर्भावात त्या देशाला उपदेश केल्याबद्दल आसूड ओढले.कोझिकोडमधील शनिवारच्या सभेत पाकिस्तानच्या जनतेला उद्देशू दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले, पाकिस्तानच्या विकासाच्या दृष्टीने काय करणे गरजेचे आहे याबद्दल तेथील जनतेला उपदेश देणे पंतप्रधान मोदी यांनी अचानक सुरु केले आहे. बहुधा पाकिस्तानातील पुढची निवडणूक लढविण्याची ते तयारी करीत आहेत. तिवारी म्हणाले की, कुपोषण, गरीबी आणि बेराजगारी यारख्या विकास मोजण्याच्या मापदंडांविषयी पाकिस्तानशी तुलना करून मोदींनी लक्ष्यच पूर्णपणे बदलले आहे. भारताने या गोष्टींविरुद्धचे युद्ध यापूर्वीच जिंकलेले असल्याने मोदी यांनी त्यासाठी लढण्याचे निरर्थक आव्हान दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींनी चालविले आहे राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण
By admin | Updated: September 26, 2016 03:40 IST