नवी दिल्ली : कठोर राजकारण्याची प्रतिमा असलेले भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पायर्यांवर नतमस्तक होत संसदेत प्रवेश केल्याने आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आपले सरकार गरिबांना समर्पित करताना त्यांनी केलेल्या भावुक तरीही आश्वासक भाषणाने राजधानीतील राजकीय नूरच पालटून गेला. मग रालोआच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब, राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी केलेले पाचारण या औपचारिकताही भावुक अंगानेच पूर्ण झाल्या. तसेच मोदी सरकार २६ तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार्या शपथविधीनंतर दिल्लीचे तख्त सांभाळणार, यावरही शिक्कामोर्तब झाले. मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे. स्पष्ट बहुमतासाठी २७२ एवढ्या खासदारांची आवश्यकता असून एकट्या भाजपाकडे त्यापेक्षा जास्तच संख्याबळ आहे. रालोआच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव सुचविल्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि एम़ वेंकय्या नायडू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत नेता निवडीचा उपचार पूर्ण केला.
मोदी सरकार गरिबांना समर्पित
By admin | Updated: May 21, 2014 05:54 IST