ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने अचानक धाड टाकल्यामुळे दिल्लीतील आप सरकार आणि केंद्र सरकारमध्ये नवीन संघर्ष सुरु झाला आहे. सीबीआयच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवलं आहे.
मोदी भित्रे आणि मनोरुग्ण आहेत, मला ते राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत म्हणून ते असे मार्ग अवलंबत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. छापेमारीवरुन अजूनही अस्पष्टता आहे. सचिवालयातील आपल्या कार्यालयावर छापा टाकल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर, दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापे टाकल्याच सीबीआयनं म्हटलं आहे.
सीबीआय खोट बोलतं आहे. त्यांनी माझ्याच कार्यालयावर छापा मारला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या फाईल्स शोधल्या जात आहेत. मोदींनी सांगावं त्यांना कुठल्या फाईल्स पाहिजेत. मी असा एकमेव मुख्यमंत्री आहे ज्याने भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून एक मंत्री आणि एका अधिका-याला हटवले आणि सीबीआयकडे ती प्रकरण सोपवली. राजेंद्र विरोधात सबळ पुरावे होते तर, मला का दिले नाहीत ? मी कारवाई केली असती असे केजरीवालांनी टि्वटसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केजरीवालांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही, ते दिवस गेले जेव्हा काँग्रेसकडून सीबीआयचा गैरवापर व्हायचा, दिल्लीचे मुख्यमंत्री केंद्राबरोबर वाद घालतात आणि मोदींना जबाबदार धरतात ही एक फॅशनच झाली आहे असे व्यंकय्या नायडू म्हणाले.