Mizoram Railway: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मिझोरमची राजधानी ऐझॉल येथे बैराबी-सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील. या उद्घाटनानंतर ऐझॉल पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडला जाईल. हा ५१.३८ किमी लांबीचा रेल्वे प्रकल्प असून, यात ४८ बोगदे आणि अनेक लहान-मोठे पूल आहेत. विशेष म्हणजे त्याच्या १९६ क्रमांकाच्या पुलाची उंची दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे.
जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र
मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी स्वतः बैराबी-सैरांग रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी १२ सप्टेंबर रोजी ऐझॉलला येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १३ सप्टेंबर रोजी ते बैराबी-सैरंग या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील. तर, सैरंग रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र म्हणून विकसित केले जाईल. त्यानंतर या रेल्वे स्थानकावरून राजधानी एक्सप्रेस सेवा देखील सुरू होईल. हा रेल्वे प्रकल्प केंद्राच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा एक भाग आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
कुतुबमिनारपेक्षा उंच पूल
हा रेल्वे मार्ग ऐझॉलला संपूर्ण देशाशी जोडेल. प्रथम हा ऐझॉलला आसाममधील सिलचरशी जोडेल, त्यानंतर तेथून संपूर्ण देशाशी जोडला जाईल. या रेल्वे मार्गात ४८ बोगदे आहेत, ज्यांची लांबी १२.८ किमी आहे. शिवाय, या मार्गात ५५ मोठे आणि ८७ लहान पूल देखील बांधण्यात आले आहेत. त्याच्या १९६ क्रमांकाच्या पुलाची उंची दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे. या पुलाची उंची १०४ मीटर आहे. हा प्रकल्प ईशान्येकडील प्रदेशातील व्यापारासह पर्यटनाला एक नवीन दिशा देईल.