नवीन सिन्हा - नवी दिल्ली
विविध दहशतवादी संघटनांकडून धोका लक्षात घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून गुप्तचर संस्थांनी कंबर कसली असून, राजधानी दिल्ली आणि अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
इंडियन मुजाहिदीन आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाकडून स्वतंत्रता दिन सोहळ्यात व्यत्यय आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गृहमंत्रलयाने गुप्तचर संघटनांना अशाप्रकारचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अधिक सक्रिय केले आहे. लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर एका सभेला संबोधित केले होते. सीमेपलिकडून प्रशिक्षित गट भारतात पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे म्हणता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधतील. दहशवाद्यांच्या धोका लक्षात घेऊन दिल्ली आणि अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात निमलष्कर दलाच्या तुकडय़ा आणि इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीत अलीकडे इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या अब्दुल सुभान यास अटक झाल्याने राष्ट्रीय गुप्तचर एजन्सी (एनआयए), गुप्तचर संस्था (आयबी) आणि इतर संस्था सतर्क झाल्या आहेत. सुभान हा हरियाणातील मेवात येथील असून, तो हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत नवीन भरती करण्याच्या मोहिमेवर होता, असे समजते. गेल्या दोन महिन्यात एनआयए दहशतवाद्यांचे ‘स्लिपर सेल’ ध्वस्त केले होते. जेयूडी, आयएम आणि इतर दहशतवादी गटांकडून पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे गुप्तचर संस्था अधिक खबरदारी घेत आहेत, असे आयबीच्या वरिष्ठ सूत्रंनी सांगितले. दरम्यान, 26/11 मुंबई हल्ल्याचा मुद्दा अमेरिकेच्या अधिका:यांकडे उपस्थित करण्याची योजना भारतीय गुप्तचर संस्थांची आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री चग हेगल उद्या, गुरुवारी भारत भेटीवर येत आहेत.