पाटणा : आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी २० फेब्रुवारीला आपले सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रतिस्पर्धी किती बलवान आहे आणि मी जिंकणार की हरणार याची अजिबात चिंता न करता एखाद्या पहिलवानासारखा मी रिंगणात उतरणार आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी मी उभा आहे, असे भावनिक भाषण मी आमदारांसमोर करणार आहे. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर माझ्या सोबत या आणि मला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे मांझी म्हणाले. भाजपचा पाठिंबा मिळणार का, असे विचारले असता मांझी म्हणाले की, ‘मी एकटाच उभा आहे. गरीब आणि दुर्बल लोकांसाठी यापुढेही काम करू द्या, हे माझे आवाहन स्वीकार करण्याची नम्र विनंती मी सर्व पक्षांच्या आमदारांना करणार आहे. लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आलो.’बिहारमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मांझी म्हणाले की, ‘मी गरीब आणि कंगाल माणूस आहे. माझ्याजवळ घोडेबाजारासाठी पैसा नाही. खरे पाहता तेच (नितीशकुमार गट) आमदारांना दिल्लीला नेऊन आणि त्यांना आलिशान हॉटेलात ठेवून घोडेबाजार करीत आहेत. दिल्ली प्रवासात प्रत्येक आमदारावर एक लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.’ नितीशकुमारांनी घोडचूक केली!मांझी यांना मुख्यमंत्री बनवून आपण चूक केली असे नितीशकुमार सांगत आहेत; परंतु त्यांनी चूक नाही तर घोडचूक केली, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या हातचे बाहुले बनून वागेन, असे गृहीत धरणे हीच त्यांची घोडचूक होती. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. (वृत्तसंस्था)
पहिलवानासारखा रिगणात उतरणार!
By admin | Updated: February 14, 2015 00:43 IST