जम्मू : पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने (बीएटी) रविवारी केलेल्या हल्ल्यात २ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान उत्तम बाळू भिकले (३०) हा शहीद झाला. शहीद भिकले हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावचा राहणारा आहे. या हल्ल्यात अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवरील अखनूर येथे हा हल्ला करण्यात आला. २ मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आधी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. हल्ला करणारे पाकिस्तानच्या सीमा कृती दलाचेच जवान असल्याचा संशय आहे. पाकिस्तानी विशेष दलाचे जवान आणि दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या या सीमा कृती दलानेच गेल्या जानेवारीमध्ये दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. यापैकी एका जवानाचा शिरच्छेद करण्यात आला होता. रविवारच्या या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनीही गोळीबार करून चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर हल्लेखोर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यात अन्य दोन जवान जखमी झाले तर उत्तम बाळू भिकले शहीद झाला. उत्तम हे २००२ मध्ये २ मराठा इन्फंट्री, कोल्हापूर येथे भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हडलगे येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण नेसरी येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले होते. एप्रिल महिन्यात ते गावी १५-२० दिवसांच्या सुटीवर आले होते. गेल्या २० एप्रिलला ते पुन्हा जम्मूकडे सेवा बजावण्यासाठी गेले होते. त्यामुळे ही त्यांची शेवटची भेट ठरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्र्षांची मुलगी, भाऊ, बहीण व भावजय असा परिवार आहे. (वृत्तसंस्था)
कोल्हापूरचा जवान शहीद
By admin | Updated: May 20, 2014 00:28 IST