ऑनलाइन टीम
मुलतान (पाकिस्तान) दि. २० - काश्मिर हे पाकिस्तानचेच आहे आणि काश्मिरमधली एकेक इंच जमिन आपण परत मिळवणारच अशी वल्गना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली आहे. भारताकडून संपूर्ण काश्मिर आपण मिळवणारच असा ठाम विश्वास त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना येथे व्यक्त केला आहे.
सध्याच्या पाकिस्तानातल्या राजकीय स्थितीवरही टीका करताना पंजाबमधल्या पूराचाही राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याची व इस्लामाबादमध्ये सत्याला दडपणा-या राजकीय नेत्यांची मक्तेदारी चालत असल्याचे बिलावल म्हणाले. याआधी पंजाब प्रांतात व पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला अपयशाचा सामना करावा लागला असला तरी पक्षाला पूर्वीचे वैभवाचे दिवस आपण दाखवू असा विश्वास बिलावल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी बोलताना व्यक्त केला आहे. सध्या पूरग्रस्तांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असलेले बिलावल भारताचा व काश्मिरचा प्रशन तापवायचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
तर काही तज्ज्ञांच्या मते बेनझीर भुत्तोंच्या हत्येनंतर व आसिफ अली झरदारींच्या हातातून सत्ता गेल्यानंतर अगडगळीत पडलेल्या बिलावल यांनी राजकीय करीअरची सुरुवात करण्यासाठी काश्मिरचा असा वापर केल्याचं व पाकिस्तानी जनतेच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.