लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. कलम ३७० समाप्त करण्याचा केंद्र सरकारचा फैसला कायम ठेवण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या पीठात त्यांचा सहभाग राहिलेला आहे. न्या. गवई (६४) यांना राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली. त्यांनी हिंदीत शपथ घेतली. त्यांनी न्या. संजीव खन्ना यांची जागा घेतली. न्या. खन्ना ६५ व्या वर्षी मंगळवारी सेवानिवृत्त झाले.
महाराष्ट्रातला जन्म : सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तींच्या रूपात त्यांना पदोन्नत करण्यात आले. नोव्हेंबर २००५ रोजी ते उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायमूर्ती झाले.
सहा महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ असणार
न्या. गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या रूपात पदोन्नत करण्यात आले. त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल.