बंगळुरु/चेन्नई : गेली १८ वर्षे रेंगाळलेल्या एका भ्रष्टाचार खटल्याचा निकाल जाहीर होणार असल्याने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यासाठी उद्या शनिवारचा दिवस निर्णायकी ठरणार आहे. निकाल विरुद्ध गेल्यास जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार असल्याने तमिळनाडूच्या राजकारणास कलाटणी देऊ शकणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बंगळुरू येथील विशेष न्यायालायाचे न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा शनिवारी सकाळी निकाल जाहीर करतील.जयललिता यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या १९९१ ते १९९६ या पहिल्या कारकीर्दीशी संबंधित हा खटला आहे. जयललिता, एकेकाळच्या त्यांच्या निकटवर्ती सहकारी शशिकला नटराजन व शशिकला यांची भाची इलावरासी आणि भाचा व्ही. एन. सुधाकरन यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून ६६.६५ कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याच्या अरोपावरून तमिळनाडू सरकारच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने हा खटला १९९६ मध्ये दाखल केला होता. तमिळनाडूत हा खटला नि:पक्षतेने चालणार नाही ही शक्यता लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने तो चेन्नईहून बंगळुरू येथील विशेष न्यायालयात वर्ग केला आहे. कोणाही राजकीय पुढाऱ्याविरुद्ध दीर्घकाळ चाललेला पहिलाच खटला असावा. यादरम्यान देशाने पाच लोकसभा निवडणुका पाहिल्या तर तामिळनाडूने तीन विधानसभा निवडणुकांना तोंड दिले. एवढ्या प्रदीर्घ काळात हा खटला चालविणारे डिकुन्हा हे पाचवे न्यायाधीश आहेत. निकालामुळे जयललिता यांच्या राजकीय भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी २००१ मध्ये ‘तानसी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात जयललिता यांना दोषी ठरविले होते. तेव्हा दोषी व्यक्तीने मुख्यमंत्रीपदावर राहणे योग्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र पुढे त्या निकालास स्थगिती मिळाली व त्यांचा राजकीय विजनवास टळला होता. (वृत्तसंस्था)
जयललितांसाठी आज ‘जजमेंट डे’
By admin | Updated: September 27, 2014 06:52 IST