राजस्थानमधील कोटपुतली येथील किरतपुरा गावात बोअरवेलमध्ये अडकलेली चिमुकली चेतना अजूनही तिला बाहेर काढण्यासाठी आलेल्या काकांची वाट पाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही आणि पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही. चिमुकली बोअरवेलमधून बाहेर पडावी, अशी प्रार्थना देश करत आहे. चेतना ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली असून दोन दिवस झाले आहेत.
NDRF चे काका, तुम्ही मला कधी बाहेर काढणार? असा प्रश्न बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतनाला पडल्य़ाचं म्हटलं जात आहे. चेतनाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRF टीमने हुकचा वापर केला. मात्र यश न आल्याने समांतर खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी हरियाणातून मशीन आणेपर्यंत बचावकार्य थांबवण्यात आलं. चिमुकली बोअरवेलमध्ये अडकल्याचं पाहून कुटुंबीय दु:खी झाले आहेत. आधीच विलंब होत असून आता मशिनच्या प्रतीक्षेत विलंब होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
सोमवारी दुपारी २ वाजता चेतना खेळत असताना ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. चेतना दीडशे फुटांवर बोअरवेलमध्ये अडकली. यानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. चेतनासाठी प्रथम ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. यानंतर बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतनाच्या हालचालींवर कॅमेऱ्यांद्वारे देखरेख सुरू करण्यात आली. मंगळवारी दुपारी चेतना १२० फुटांवर पोहोचली. मात्र त्यानंतर अडचण सुरू झाली, बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी दौसा येथे आर्यन नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता, त्याला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले होते. ही बचाव मोहीम यशस्वी झाली नाही. कारण आर्यनचा बोअरवेलमध्ये मृत्यू झाला होता. आर्यन केवळ ऑक्सिजनच्या मदतीने सुमारे ५० तास जिवंत राहिला. त्याला ना अन्न मिळालं , ना पाणी. आर्यनला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने आधी घरगुती उपायाचा अवलंब केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. यानंतर त्यांनी बोअरवेलला समांतर नवीन खड्डा खोदण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.