Jagannath Rath Yatra June 2025: आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा असते. २७ जून २०२५ रोजी सकाळी रथयात्रा सुरू झाली. परंतु, या रथयात्रेला गालबोट लागले आहे. प्रचंड जनसमुदारामुळे येथील व्यवस्था फोल ठरली. प्रचंड गर्दीमुळे तब्बल ६०० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर रथयात्रा थांबवण्यात आली असून, उद्या पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या महितीनुसार, महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे जखमी झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे ६०० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे. यामुळे रथयात्रेला उशीर झाला. विशेषतः भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाला. रथयात्रेच्या मार्गावरील एका वळणावर रथ ओढण्यात खूप अडचण आली. ज्यामुळे रथयात्रा मंदावली. रथ ओढणे थांबल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक एकाच ठिकाणी जमा झाले. मोठ्या प्रमाणात रथयात्रेत आलेले लोक प्रतिबंधित क्षेत्रात घुसले. यामुळे रथांच्या सुरळीत हालचालीत मोठा अडथळा निर्माण झाला. गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. प्रचंड जनसमुदायामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली. या गोंधळामुळे मोठ्या संख्येने भाविक अस्वस्थ झाले. शेकडो भाविकांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. त्यापैकी शेकडो लोकांवर पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात आले. रथ ओढताना संपूर्ण रथयात्रा मार्गावर या घटना घडल्या. सुदैवाने, चेंगराचेंगरी झाली नाही आणि कोणीही जीवितहानी झाली नाही, असे सुरक्षा यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
जगन्नाथ रथयात्रेदरम्यान अनेक भाविक बेशुद्ध पडले. काही जण जखमी झाले. ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रथयात्रेतील घटना कदाचित अति उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे झाली असावी. परंतु बचाव पथकाने तातडीने मदत केली. त्यांना रुग्णालयात नेले. भगवान जगन्नाथ मंदिराजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पिण्याचे पाणी आणि ग्लुकोजची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरेशी वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी मी स्वतः आलो आहे. रुग्णालयात जाऊनही भेट देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, जगन्नाथ रथयात्रेसाठी देशासह जगभरातून लाखो भक्त पुरी येथे पोहोचतात. जगन्नाथ मंदिरापासून सुमारे २.५ किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत बलराम, सुभद्रा आणि जगन्नाथ यांचे रथ हातांनी ओढून नेतात. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा एक आठवडा गुंडीचा मंदिरात राहतात, असे सांगितले जाते.