नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही, तर हवामान बदलासंदर्भात ठोस कृती करण्यासारख्या महत्त्वपूर्ण जागतिक प्रश्नांवरही प्रभावी कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या सरकारला सत्तेवर येऊन सोमवारी ११ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने सामाजिक न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. वंचित समूहांचे इतक्या प्रमाणात प्रतिनिधीत्व आजवर कधीही केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले नव्हते.
मोदी यांनी लिहिले आहे की, १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागातून भारताने गेल्या ११ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या तत्त्वानुसार सरकारने अनेक मूलगामी बदल घडवून आणले. त्यात आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक उत्थानापर्यंत या सरकारने अनेक उत्तम कामे केली. तसेच, विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने आता आम्ही पावले उचलली आहेत.
कार्यकाळाची इतिहासात नोंद होणार सुवर्णाक्षरांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ११ वर्षांत देशात घडविलेल्या सकारात्मक बदलांमुळे या कार्यकाळाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला लोकाभिमुख बनविले. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याइतक्या जागा जिंकता आल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारताची’ पायाभरणी झाली असे ते म्हणाले.
११ वर्षांत मोदी सरकारने नेमके काय केले?
८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.
१५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचले आह;.
४ कोटी घरे गरिबांसाठी घरे बांधण्यात आली.
१२ कोटी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.
६८ लाख फेरीवाल्यांना कर्ज मिळाले.
५२.५ कोटी लघुउद्योजकांना कर्जवाटप झाले आहे.
२० कोटी महिलांना विविध योजनांतर्गत रोख स्वरूपात कोरोना काळात मदत करण्यात आली.
१२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर.
२०१४ मध्ये देशात आली होती शिथिलता, पण...
मोदी सरकारने जनहितासाठी काम केले. भारत आपले सार्वभौमत्व व सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, देशाने नव्या आर्थिक पुनरुत्थानाच्या, सामाजिक न्यायाच्या युगात प्रवेश केला आहे.
२०१४ मध्ये देशात सर्व बाबतीत शिथिलता आली होती. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत ‘सुधारणा, कार्यक्षमता आणि परिवर्तन’ या त्रिसूत्रीच्या बळावर आत्मनिर्भरता आणि विकासाकडे वेगाने वाटचाल करत
आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.