लोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार हाती घेतला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्र्यांची संक्षिप्त ओळख...
नरेंद्र दामोदरदास मोदी (पंतप्रधान)
जन्म : १७ सप्टेंबर १९५0, वडनगर, जि. मेहसाणा, गुजरात
शिक्षण : राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी, गुजरात विद्यापीठ
पत्नी : जशोदाबेन मोदी (विवाह १९६८)
इतर मागासवर्गीय जातीतील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, - दामोदरदास मूलचंद मोदी आणि हिराबेन यांच्या सहा अपत्यांपैकी तिसरे अपत्य
किशोरवयात आपल्या भावाबरोबर चहाचे दुकान चालविले.
तरुण वयातच महाविद्यालयीन काळात आरएसएसचे पूर्ण वेळ प्रचारक
१९९५ : भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती (पाच राज्यांची जबाबदारी)
१९९८ : सरचिटणीस (संघटन) म्हणून बढती, ऑक्टोबर २00१पर्यंत पदावर होते.
फेब्रुवारी २00२मध्ये गुजरातमधील गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगली हाताळण्यात अपयश आल्याचा मोदी प्रशासनावर आरोप
१७ सप्टेंबर २0११ - २0१२ : सद्भावना अभियानांतर्गत उपोषण
सप्टेंबर २0१३ : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा
१६ मे २0१४ : लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत
परदेश दौरे : चीन, सिंगापूर व जपानसह विविध देशांना भेटी
गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ
0७ ऑक्टो. 0१- २२ ऑक्टो. 0२
२२ डिसेंबर 0२ - २२ डिसेंबर 0७
२३ डिसेंबर 0७ - २0 डिसेंबर १२
२0 डिसेंबर १२ - २२ मे २0१४
नितीन गडकरी (रस्ते वाहतूक व जहाजबांधणी)
जन्म : २७/0५/१९५७ : मतदारसंघ : नागपूर
शिक्षण : एम कॉम, एलएलबी, डीबीएम
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९७६ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अभाविपचे सक्रिय सदस्य झालेले नितीन गडकरी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत भरारी घेतली. १९८५मध्ये गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र ते पराभूत झाले १९८९मध्ये ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर सलग चारवेळा ते विजयी झाले. १९९२मध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस होत राज्याच्या राजकारणात पाऊल टाकले. अशातच १९९५मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. २00४ला भाजपाची राज्याची सूत्रे त्यांच्या हाती आली. २0१0मध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
राजनाथसिंह (गृह मंत्रालय)
जन्म : १0 जुलै १९५१
बाभोरा (उत्तरप्रदेश)
पक्ष : भाजपा
मतदारसंघ : लखनौ
शिक्षण : एम.एस्सी. (फिजिक्स)
१९७५ मध्ये ते भारतीय जनसंघाचे मिर्झापूरचे सचिव बनले. १९७७ मध्ये त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभेत प्रवेश केला. १९८४ मध्ये उत्तरप्रदेशचे ते पक्षाध्यक्ष बनले.१८८८ मध्ये राजनाथ उत्तरप्रदेश विधानपरिषदेवर निवडून गेले. १९९१ मध्ये ते उत्तरप्रदेश राज्य सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाले. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात त्यांना रस्ते वाहतूक खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. राजनाथ यांनी २000 ते २00२ या काळात उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभारही सांभाळला.२0१३ मध्ये नितीन गडकरी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा पक्षाचे अध्यक्ष झाले.
सुषमा स्वराज (परराष्ट्र मंत्रालय)
जन्म : १४ फेब्रुवारी १९५३ (अंबाला, हरियाणा)
शिक्षण : बी.ए., एलएलबी
मतदारसंघ : विदिशा
पक्ष : भाजपा
१९७७ मध्ये चौधरी देवीलाल यांच्या राज्य मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. हरियाणामध्ये १९८७ मध्ये भाजपा-लोकदल आघाडी सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. १९९0 मध्ये त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. १९९६ मध्ये दक्षिण दिल्ली मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात लोकसभेच्या थेट प्रक्षेपणास प्रारंभ केला. १९९८ मध्ये त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. २00३ मध्ये त्यांनी आरोग्य खात्याचा कारभार पाहिला.
अरुण जेटली (अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण)
जन्म : २८ डिसेंबर १९५२
(नवी दिल्ली)
शिक्षण : बी.कॉम.,
एलएल. बी.
मतदारसंघ : अमृतसर
पक्ष : भाजपा
अरुण जेटली यांचे वडील भारतातील नामांकित वकील होते. अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली. या काळात ते विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. या काळातच त्यांचा संबंध अ.भा.वि.संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती झाली. बोफोर्स प्रकरणातील कागदपत्रे पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात माहिती-प्रसारण खात्याचे मंत्री होते.कंपनी कायदे खात्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे होती.
डी.व्ही. सदानंद गौडा (रेल्वे)
जन्म : १९/0३/१९५३
मतदारसंघ : उत्तर बंगलोर
शिक्षण : बी. एस्सी, एलएलबी
पक्ष : भाजपा
कर्नाटकच्या कोकण
किनारपट्टीवर उडप्पी जिल्ह्यात तुलू समाजात त्यांचा जन्म झाला. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत आले. विद्यार्थी परिषद, कामगार चळवळीपासून सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी काम केले. भाजपामध्ये काम करीत ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. २00४मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून आले. ते कर्नाटक भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी असतानाच २00८मध्ये राज्यात पक्ष सत्तेवर आला. ऑगस्ट २0११मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. पक्षांतर्गत घडामोडींमुळे त्यांना एकच वर्ष संधी मिळाली.
नजमा हेपतुल्ला (अल्पसंख्यांक)
जन्म : १३ एप्रिल १९४0 (भोपाळ, मध्यप्रदेश)
मतदारसंघ : मध्यप्रदेश
शिक्षण : एम.एससी. (झूलॉजी), पीएचडी (कार्डियाक अँनाटॉमी)
पक्ष : भाजपा
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा राजकीय वारसा लाभलेल्या डॉ. नजमा हेपतुल्ला या सध्या भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली. १९८0, १९८६, १९९२ आणि १९९८ असे सलग चार वेळा महाराष्ट्रातून त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. १९८५ ते २00४ या काळात त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या. २00४ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २0१२ मध्ये मध्यप्रदेशमधून राज्यसभेत गेल्या आहेत.
रामविलास पासवान (अन्न, ग्राहक संरक्षण)
मतदारसंघ : हाजीपूर (बिहार)
शिक्षण : एम.ए. बॅचलर ऑफ लॉ
पक्ष : लोकजनशक्ती पार्टी
राजकीय कारकीर्द : १९६९ मध्ये बिहार विधानसभेवर रामविलास पासवान पहिल्यांदा निवडून गेले. आणीबाणीच्या काळात त्यांचा जयप्रकाश नारायण यांच्याशी संपर्क आला. या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९७७ मध्ये ते जनता पक्षाचे सदस्य बनले आणि पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिले. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री व कोळसा मंत्रालयही सांभाळले. २000 मध्ये त्यांनी लोकजनशक्ती पक्ष स्थापन केला.२00४ मध्ये युपीए सरकारमध्ये त्यांनी रसायन आणि खते व पोलाद खात्याचे मंत्री होते.
गोपीनाथ मुंडे ( ग्रामविकास)
जन्म : १२/१२/१९४९ : मतदारसंघ : बीड
शिक्षण : बी. कॉम : पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.
प्रकाश केशव जावडेकर (माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री)
जन्म : ३0/0१/१९५१
राज्यसभा सदस्य : २00८पासून
शिक्षण : बी. कॉम
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९८४मध्ये जावडेकर यांची भाजयुमोच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली. १९८९ ते ९५ दरम्यान ते प्रदेश भाजपाचे सरचिटणीस राहिले. पदवीधर मतदारसंघातून निवडून येत १९९0 ते २00२ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. २00२मध्ये ‘आय टी फॉर मासेस’ या केंद्रीय गटाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९९४ ते ९६ आणि २00२ ते 0३ दरम्यान प्रदेश भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिले. २00२मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून पराभव झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
रविशंकर प्रसाद (कायदा व बालकल्याण)
जन्म : ३0 /0८/ १९५४,
मतदारसंघ : राज्यसभा (बिहार)
शिक्षण : एलएल. बी. (पटना विद्यापीठ)
पक्ष : भाजपा
राजकीय कारकीर्द : १९७0-७१ या काळात जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ ेकेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध पदांवर काम केले
पटना उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केल्यानंतर २000 साली त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांना कोळसा आणि खनिकर्म खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले. २00६ मध्ये ते बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर २0१२ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर गेले.
ज्युऐल ओराम (आदिवासी विकास मंत्रालय)
जन्म : २२ मार्च १९६१
शिक्षण: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्ां पदविका
मतदारसंघ : सुंदरगड
पक्ष : भाजपा
राजकीय कारकीर्द : ज्युऐल ओराम यांनी ओरिसा विधानसभेच्या निवडणुकीतून आपली कारकीर्द सुरू केली. १९९0 आणि १९९५ या दोन निवडणुकांत त्यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. ज्युऐल ओराम यानी १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओडिशामधील महत्त्वाचे भाजपा नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी १२व्या, १३व्या आणि १४व्या लोकसभेत प्रतिनिधित्व केले. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळणारे ओराम यांची भाजपच्या ओडिशा राज्य अध्यक्षपदीही निवड झाली होती.
स्मृती इराणी ( मनुष्यबळ विकास)
जन्म : २३ मार्च १९७६,
मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माता म्हणून ओळख.
पक्ष : भाजपा
भाजपाच्या प्रमुख महिला कार्यकर्त्या : १६ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून अमेठी मतदारसंघातून १ लाख ७ हजार मतांनी पराभूत. २00३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश.
२00४ मध्ये काँग्रेसचे कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातून अयशस्वी लढत दिली. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून २0१0 मध्ये निवड. २0११ मध्ये गुजरातमधून राज्यसभा सदस्य म्हणून स्मृती इराणी यांची निवड झाली.
रावसाहेब दादाराव पाटील दानवे (ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री)
जन्म : १८/0३/१९५४
मतदारसंघ : जालना (महाराष्ट्र)
शिक्षण : बीए : पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९७६ साली गावच्या सरपंचपदी विराजमान होत रावसाहेब दानवे यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जालना लोकसभा मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. १९८५ सालच्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यांचा पराभव झाला नाही. १९९0 ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले. याशिवाय दानवे यांनी रामेश्वर सहकारी साखर कारखाना, पंचायत राज समितीचे राज्याध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
व्यंकय्या नायडू (संसदीय कामकाज, नगर विकास, गृह निर्माण)
जन्म : १/0७/१९४९
राज्यसभा सदस्य
शिक्षण : एलएलबी
पक्ष : भाजपा
व्यंकय्या नायडू हे विद्यार्थी दशेपासनूच संघ परिवाराशी जोडले गेले. विद्यार्थी नेता ते शेतकर्यांचा लढावू नेता असा यांचा प्रवास आहे. जयप्रकाश नारायणांच्या चळवळीने भारलेल्या व्यंकय्यांनी आणीबाणी विरूध्दच्या संघर्षात उडी घेतली, कारावासही भोगला. १९८0च्या दशकात ते भाजयुमोतून पूर्णपणे भाजपात दाखल झाले. तेथूनच त्यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरूवात झाली. आंध्रप्रदेश विधानसभेत तीन सदस्यीय गटाचे नेतृत्व त्यांनी केले. १९८५ नंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांचे नेतृत्व उदयाला आले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
डॉ. हर्षवर्धन (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)
जन्म : १३ डिसेंबर १९५४
मतदारसंघ : चांदणी चौक (दिल्ली)
शिक्षण : मास्टर ऑफ सर्जरी
पक्ष : भाजपा
शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्य. १९९३ मध्ये कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून विजयी. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांना ‘पल्स पोलिओ
मोहिमेचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. त्यानंतर त्यांनी काहीकाळ शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. २0१३ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.
राधा मोहन सिंग (कृषी)
जन्म : १/0८/१९४९ मतदारसंघ : पूर्व चंपारण्य
शिक्षण : बी.ए.
राजकीय कारकिर्द : राधा मोहनसिंग हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. ते १९८0मध्ये भारतीय युवा जनमोर्चाचे अध्यक्ष होते. तसेच २00६-२00९ या काळात बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. ते पहिल्यांदा १९८९मध्ये नवव्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर ११व्या, १३व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात ते कृषी राज्यमंत्री होते.
पीयूष गोयल (उर्जा राज्य मंत्री)
जन्म : १३/0६/१९६४
राज्यसभा सदस्य : महाराष्ट्र
शिक्षण : बी. कॉम, एलएलबी
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : पीयूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे केंद्रीय मंत्री होते. तर गोयल यांची आई चंद्रकांता गोयल यांनी मुंबईतून विधानसभेवर तीनवेळा निवडून येण्याची किमया करून दाखवली आहे. राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून पीयूष गोयल यांची ओळख आहे. पक्षवाढीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ‘माहिती संवाद मोहीम समिती’चे ते प्रमुख
आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या वित्त आणि सल्लागार समितीवरील स्थायी समितीचेही ते सदस्य आहेत.
अनंतकुमार ( रसायन आणि खत)
जन्म : २२ जुलै १९५९ (बंगलोर)
मतदारसंघ : दक्षिण बंगलोर
शिक्षण : बी. ए., एलएलबी
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून समाजकार्यास प्रारंभ. विद्यार्थी परिषद, भारती युवा मोर्चा ते भाजपा असा राजकीय प्रवास सुरू. भाजपा युवा मोर्चाचे कर्नाटकाचे अध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्य. १९९६मध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. त्याच वर्षी ११व्या लोकसभेत दक्षिण बंगलोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. १९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला.
नरेंद्रसिंग तोमर (कामगार व रोजगार, स्टील मंत्रालय)
जन्म : १६ जून १९५७ (मोरार, ग्वालियर,)
मतदारसंघ : मोरेना
शिक्षण : पदवीधर
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९९८ ते २00८ दरम्यान दोन वेळा मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले. २00६पासून भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. २00३-२00७ या कार्यकाळात ते मंत्री होते. तर २00९मध्ये खत आणि रसायन खाते समितीचे सदस्यपद आणि जानेवारी २00९मध्ये राज्यसभेचे सदस्यपद भूषविले.
कलराज मिश्र (लघु उद्योग मंत्री)
जन्म : १/0७/१९४१
मतदारसंघ : देवरिया
शिक्षण : एम. ए.
पक्ष : भाजपा
मिश्र यांनी १९६३मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिले. १९६८मध्ये ते भारतीय जनसंघाचे सदस्य बनले. १९७४मध्ये जयप्रकाश यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. १९७८मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. १९८६ ते २00१ दरम्यान ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९९८मध्ये ते उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री बनले. २000मध्ये ते पुन्हा सार्वजनिक बांधकाम व वैद्यकीय शिक्षणमंत्री बनले. याच वर्षी त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड झाली. २0१२मध्ये ते लखनौ पूर्व या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले.
हरसिमरत कौर-बादल (अन्न प्रक्रिया मंत्रालय)
जन्म : २१/0७/१९६६
मतदारसंघ : भटिंडा
शिक्षण : टेक्सटाईल डिप्लोमा
पक्ष : शिरोमणी अकाली दल
हरसिमरत या पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या स्नुषा आणि उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबीयांतील हरसिमरत कौर या भटिंडा लोकसभा मतदारसंघातून दुसर्यांदा निवडून आल्या आहेत. २00९ मध्ये हरसिमरत
कौर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रानिंदर सिंग यांचा १ लाख २0 हजार मतांनी पराभव केला होता. मुली आणि वृक्षे वाचविण्यासाठी पंजाबमध्ये नन्ही जान हे अभियान हरसिमरत यांनी राबविले होते.
मेनका गांधी (महिला व बालकल्याण मंत्री)
जन्म : २६ /0७/१९५६
मतदारसंघ : पिलभित
शिक्षण : पदवीधर
पक्ष : भाजपा
मेनका गांधी या केंद्रातील चार सरकारमध्ये मंत्री होत्या. १९८८-८९मध्ये त्या जनता दलाच्या सरचिटणीस होत्या. १९८९मध्ये त्या पहिल्यांदा पिलभितमधून लोकसभेवर निवडून गेल्या. जानेवारी ते एप्रिल १९९0 या काळात त्यांच्याकडे कार्यक्रम अंमलबजावणी खात्याचे राज्यमंत्रिपद सोपविण्यात आले. १९९६, १९९८, १९९९, २00४च्या लोकसभा निवडणुकीतही त्या निवडून आल्या. २00९ला पिलभित मतदारसंघ पुत्र वरुण गांधी यांच्यासाठी सोडला आणि औनला मतदारसंघातून सहाव्यांदा लोकसभेवर गेल्या.
अशोक गजापती राजू (नागरी उड्डाण मंत्री)
जन्म : १६/0६/१९५१ मतदारसंघ : विजयानगर
पक्ष : तेलगू देसम पार्टी
राजकीय कारकिर्द : १९७८ साली जनता पक्षाकडून प्रथम विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर १९८३, १९८५, १९८९, १९९४, १९९९ आणि २00९मध्ये तेलगू देसम पार्टीचे उमेदवार राहिले आहेत. एन.टी. रामाराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि वाणिज्य खाते होते; तर एन. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात अर्थ आणि विधी खाते होते. ३६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या वेळी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली आहे. तेलगू देसम पार्टीमध्ये ते पॉलिट ब्यूरोचे सदस्य आहेत.
अनंत गीते (अवजड उद्योग)
जन्म : २/0२/१९५१ : मतदारसंघ : रायगड
शिक्षण : जुनी एसएससी : पक्ष : शिवसेना
राजकीय कारकिर्द : सन १९८५मध्ये गीते मुंबई महापालिकेत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९0 ते १९९२ या काळात महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. १९९६मध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून येत सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर रायगड मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले. १९९८ ते २000 या कालावधीत ते विविध समित्यांचे सदस्य होते. २00९मध्ये ते पाचव्यांदा निवडून येऊन संसदेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अन्न, ग्राहक व्यवहार आदी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.
तवरचंद गेहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय)
जन्म : १८/0५/१९४८ (उज्जैन, मध्य प्रदेश)
मतदारसंघ : शहजापूर (मध्य प्रदेश)
शिक्षण : बी. ए. (विक्रम विद्यापीठ, उज्जैन)
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९७७ पासून राजकारणात सक्रिय. भाजपाचे उज्जैन जिल्हा उपाध्यक्ष, १९८४मध्ये मध्य प्रदेशचे भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव, १९९0मध्ये मध्य प्रदेशचे पाणीपुरवठा मंत्री, सलग चौथ्यांदा शहजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २0१२पासून राज्यसभा सदस्य, भारतीय जनता पार्टीचे ते राष्ट्रीय सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
उमा भारती (जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान)
जन्म : ३/0५/१९५९
मतदारसंघ : झाशी (उत्तर प्रदेश)
शिक्षण : सहावी (टीकमगढ)
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९८४मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली; परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १९८९मध्ये खजुराहो या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला व १९९१, १९९६ व १९९८लाही त्या आल्या.वाजपेयी सरकारच्या काळात त्या मंत्री झाल्या. तर २00३मध्ये त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या.२00४मध्ये आडवाणींविरोधात टीका केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. २00५मध्ये ते निलंबन मागे घेण्यात आले. याच वर्षी पक्षाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंग यांची नियुक्ती केली. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम ठोकून ‘भारतीय जनशक्ती’ हा पक्ष स्थापन केला.७ जून २0११ रोजी त्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला.
श्रीपाद यासो नाईक (सांस्कृतिक व पर्यटन ( स्वतंत्र प्रभार)
जन्म : ४/१0/१९५२
मतदारसंघ : उत्तर गोवा
शिक्षण : बी. ए. (मुंबई विद्यापीठ)
पक्ष : भाजपा
राजकीय कारकिर्द : १९८४पासून राजकारणात सक्रिय. धुर्भतचे सलग दहा वर्षे सरपंच (१९८४ ते ९३), १९८८मध्ये गोव्याचे भाजपाचे सहसचिव, १९९४पासून सलग दोन वेळा आमदार, १९९९मध्ये तेराव्या लोकसभेसाठी निवड, भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यवाह, विविध समित्यांवर सदस्य. गोवा येथील विद्यार्थी निधीचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक संघाचे अध्यक्ष. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा (१९९९, २00४, २00९ आणि २0१४ ) प्रतिनिधित्व करीत आहेत.