जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळल्याने बिहार पोलिस मुख्यालयाने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. या दहशतवाद्यांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट) आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी झाली आहे.
जैशचे तीन दहशतवादी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल राज्य पोलिस मुख्यालयाने सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्क केले. सीमावर्ती जिल्ह्यांच्या एसपींना सतर्क करण्यात आले. नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत. पूर्णियाचे डीआयजी प्रमोद कुमार मंडल म्हणाले की, राज्य पोलिस मुख्यालयाच्या सूचनांनुसार, सीमावर्ती जिल्ह्यांना अतिरिक्त सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
दहशतवादी कारवाया
हे दहशतवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूमध्ये पोहोचले. गेल्या आठवड्यात बिहारमध्ये दाखल झाले असल्याची माहिती आहे. हे दहशतवादी देशाच्या कोणत्याही भागात दहशतवादी घटना घडवून आणण्याचा कट रचत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांची नावे आणि फोटो सार्वजनिक केली आहेत. त्यांच्या पासपोर्टशी संबंधित माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. हे दहशतवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले आणि तिसऱ्या आठवड्यात नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश केला. ते मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. सीतामढी, मधुबनी, पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज आणि सुपौल या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा संस्था सतर्क आहेत. कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिस मुख्यालयाने सर्वसामान्यांना केले आहे. गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि संशयित दहशतवाद्यांवर योग्य कारवाई करण्यासाठी पोलिस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांची गुप्तचर यंत्रणा सक्रिय केली आहे.