ऑनलाइन टीम
अमेठी, दि.५ - कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत प्रचारादरम्यान सोनिया गांधी, प्रियांका गांधीसह सर्वांवर हल्लाबोल करत विरोधकांनी माझ्या पराभवाची चिंता करू नये, हरलो तर चहा विकेन, अशा भावनिक शब्दांत नरेंद्र मोदींनी अमेठीवासियांना साद घातली. अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते. आपण एका सुखी, संपन्न राज्याचा मुख्यमंत्री असतानाही आपली आई मतदानासाठी एका साध्या रिक्षातून गेली असे सांगत रोजच्या जगण्यासाठी 'भ्रष्टाचाराची' गरज नसते असेही ते म्हणाले. भ्रष्टाचार करत नाही आणि कोणाला करूही देत नाही, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्मृती इराणी आपली छोटी बहीण असल्याचे सांगत 'अमेठीवासीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्मृतीला उमेदवारी' दिल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. आपण अमेठीत मागण्यासाठी आलो आहोत, लुटण्यासाठी नव्हे असे सांगत काँग्रेसने येथे लुटालूट केल्याची टीकाही त्यांनी केली. घराणेशाहीमुळे अमेठीत ४० वर्षात तीन पिढ्यांची वाट लागली, आता हे चित्र बदलेल असेही ते म्हणाले.