ऑनलाइन टीम
लखनऊ, दि. २६ - दिल्लीहून गोरखपूरच्या दिशेने निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसून झालेल्या अपघातात ४० प्रवासी ठार तर १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी बस्ती जिल्ह्यातील चुरैब रेल्वे स्टेशनजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. पावणेअकराच्या सुमारास गोरखधाम एक्स्प्रेसची संतकबीरनगरमधील चुरैब रेल्वे स्टेशन येथे मालगाडीला धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की गोरखधाम एक्स्प्रेसचे सहा डबे रुळांवरून घसरून एकमेकांवर पडले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस व रेल्वे प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोचले व त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या अपघातात आत्तापर्यंत ४० प्रवासी ठार झाले असून १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.