नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गौतमनगर झोपडपीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने तेथील सुमारे एक हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिसराची पाहणी केली असून, याबाबत त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्यांमधील दूषित पाणी येत असल्याची तक्रार छावा संघटनेने यापूर्वीच केली होती. परंतु उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळ व पोलीस प्रशासनाने याची दखल न घेता टाळाटाळ केली असता, संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज पाहणी करून उद्योजकांच्या निदर्शनास सदर परिस्थिती आणून दिली. तसेच अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), औद्योगिक विकास महामंडळ व महापालिका या परिसराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही पदाधिकार्यांनी केला. यावेळी छावा संघटनेचे करण गायकर, रवि भारद्वाज, बाळा खांडे, शिवा तेलंग, विजय वाहुळे, सुनील गुंजाळ, लकी धीमन, किरण डोखे, मनोज पवार, संजय रोकडे, नरेश मांडे नितीन पाटील, सचिन सोनवणे, सोनू महाजन, किरण बोरसे तसेच उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गौतमनगर झोपडपीत घाणीचे साम्राज्य रहिवाशांचे आरोग्य धोक्यात : छावाचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: May 27, 2014 00:08 IST