नवी दिल्ली : मोठी वित्तीय चणचण सोसत असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून लवकरच प्रवासी भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही भाडेवाढ कधी करायची हे अद्याप ठरले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.रेल्वे अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मांडला जाईल, असा अंदाज आहे. भाडेवाढ करण्यासाठी रेल्वेला अर्थसंकल्पाच्या माध्यमाची गरज आता राहिलेली नाही. इंधनाच्या किमतीमधील वाढीनुसार भाड्यातील इंधन समायोजन शुल्क आपोआप वाढविण्याचे धोरण रेल्वेने याआधीच स्वीकारले असल्याने अर्थ संकल्पाच्या आधी किंवा नंतरही भाडेवाढ केली जाऊ शकते.खरे तर १६ मे रोजी म्हणजे ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्याचदिवशी रेल्वेने इंधन समायोजन आकारातील बदलानुसार मालभाड्यात १४.२ टक्के व प्रवासी भाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती; परंतु काही तासांतच ही भाडेवाढ मागे घेऊन याविषयीचा निर्णय नव्या सरकारवर सोडण्यात आला होता.मागच्या संपुआ सरकारने निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सादर केलेल्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यात वाढ केली नव्हती. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेची नाजूक वित्तीय स्थिती पाहता भाडेवाढ करण्यावाचून गत्यंतर नाही. फक्त ती कधी करायची याचा निर्णय नवे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घ्यायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इंधन दरवाढीमुळे रेल्वेची लवकरच भाडेवाढ?
By admin | Updated: June 18, 2014 05:25 IST