श्रीनगर : परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी कुरापतींना लगाम घालण्यावर भर देतानाच नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी सुरू राहिल्यास पाकिस्तानशी वाटाघाटी बंद करण्यात येतील, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आखलेल्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्याच दौऱ्यात जेटली पत्रकारांशी बोलत होते. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी सुरू राहिल्यानंतरही वाटाघाटी प्रक्रिया सुरू राहील काय, असे विचारले असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले, परिस्थिती सामान्य राहण्यासाठी नियंत्रण रेषेवरील मर्यादांचे उल्लंघन थांबणे अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही देशात विश्वास भावना निर्माण होण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल आहे, असे जेटली म्हणाले. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांसोबत शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास इच्छुक आहे, असे भारताने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य ठेवण्यासाठी सीमेवर अमन-शांती ठेवणे ही पूर्वअट असल्याचे स्मरण देखील भारताने पाकिस्तानला करून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित केले होते. यावेळी मोदींनी शरीफ यांच्याशी मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणाचा पाकिस्तानात सुरू असलेल्या सुनावणीला वेग देण्याबद्दल चर्चा केली होती. या घटनेला भारत-पाकिस्तानमधील संबंधाबाबत सकारात्मकतेने बघितले गेले होते. पाकिस्तानी सैन्यांनी भारताच्या एका जवानाचे शीर छाटल्याच्या घटनेनंतर गेल्या वर्षी जानेवारीत भारत-पाकिस्तानमधील वाटाघाटीचा तिसरा टप्पा ठप्प झाला होता. जेटली यांनी राज्यपाल एन.एन. व्होरा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांशी वेगवेगळी बैठक घेतली त्यांनी आज सकाळी ओमर अब्दुल्ला आणि प्रशासन, लष्कर, पोलीस आणि निमलष्कर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विशेष सुरक्षेचा आढावा घेतला. (वृत्तसंस्था)
शस्त्रसंधी पाळा, अन्यथा वाटाघाटी बंद
By admin | Updated: June 16, 2014 03:50 IST