मुझफ्फरपूर/ पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जाळपोळीत आणखी एक मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली. रविवारी हिंसाचाराचे वृत्त धडकताच मुख्यमंत्री जितन राम मांझी मुंबई भेट अर्धवट सोडून पाटण्यात परतले आहेत.मुझफ्फरपूरलगतच्या गावी अपहरण झालेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त जमावाने एका समुदायाची नऊ घरे पेटवून दिली होती. यात मोठी हानी झाली. गावात व आसपासच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या गावात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. बिहार लष्करी पोलीस दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले. या गावातील दोन्ही समुदायांनी शांतता राखावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)
मुझफ्फरपूर जाळपोळीत पाच ठार; १४ अटकेत
By admin | Updated: January 20, 2015 01:40 IST