Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कटरा आणि श्रीनगर यादरम्यान धावणाऱ्या दोन खास वंदे भारत रेल्वे ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी २-३ तासांनी कमी झाला आहे. तसेच काश्मीर खोऱ्याशी सर्व ऋतूंमध्ये संपर्क राखता येईल, असा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी याच वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला. ही ट्रेन चिनाब नदीवरील पुलावर येताच फारूक अब्दुल्ला भावुक झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुक अब्दुल्ला वंदे भारत ट्रेनमधील या प्रवासादरम्यान बोलताना सांगितले की, ही वंदे भारत ट्रेन जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी सर्वांत मोठी भेट आहे. नौगाम (श्रीनगर) रेल्वे स्टेशनवरून फारुक अब्दुल्ला यांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवासाला सुरुवात केली आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास केला. या ट्रेनमुळे केवळ आमचे पर्यटनच नाही तर आमचा व्यापारही वाढेल. आमची उत्पादने कन्याकुमारी, पटना, कोलकाता, मुंबई येथे पोहोचतील. याचा आम्हाला खूप फायदा होईल. आमचे स्वप्न होते की, एक दिवस जम्मू-काश्मीर देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल आणि हे स्वप्न या ट्रेनमुळे पूर्ण होत आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो, असे फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
चिनाब नदीवरील पुलावर वंदे भारत ट्रेन आली अन् फारुक अब्दुल्ला भावुक झाले
कटरा-श्रीनगर रेल्वे लिंकद्वारे काश्मीर खोरे पहिल्यांदाच संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. जम्मू आणि काश्मीरला ही सर्वांत मोठी भेट आहे. चिनाब पूल ओलांडताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. अखेर तो दिवस आला आहे जेव्हा आपण काश्मीरहून देशात रेल्वेने प्रवास करू शकू, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. तसेच यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही आठवण काढली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या चिनाब पूल प्रकल्पामध्ये योगदान दिले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रेल्वेने काश्मीरला येण्याचे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प पूर्ण केला, असे ते म्हणाले.
दरम्यान, कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है". दुसरीकडे, काश्मीर रेल्वे मार्गातील कटरा-बनिहाल या दरम्यानचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे अंजी खड्ड पूल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. ७२५ मीटर लांब आणि ३३१ मीटर उंचीचा हा पूल २६ केबलवर उभा आहे आणि पर्यटकांसाठी ते एक खास आकर्षण आहे.