गजानन जानभोर/यदू जोशी, नवी दिल्ली - रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी प्रचंड प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता नाही. मंत्रिपदासाठी त्यांनी सोमवारी थेट मोदींशी संपर्क साधला, पण त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही. ‘भाजपा-शिवसेनेने आपल्याला सत्तेत वाटा दिला तर ठीक, नाही तर आपण युतीला टाटा करू, असे आठवले यांनी निवडणूक प्रचार काळात ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तथापि, आता मंत्रिपद मिळाले नाही तरी ते महायुतीसोबतच राहतील, अशी स्थिती आहे. सूत्रांनी सांगितले की, आठवले यांनी दोन दिवसांपासून मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती पण ती त्यांना मिळू शकली नाही. सोमवारी मोदींनी त्यांना फोन केला. आपल्याला मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रात महायुतीला त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, या शब्दांत आठवले यांनी मोदींना साकडे घातले. आठवले यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे आधी मंत्रिपदासाठी गळ घातली होती; पण त्यांनी दाद दिली नाही. शेवटी त्यांनी मोदींशी संपर्क साधला. भाजपा वा शिवसेनेच्याही कोट्यातून आपल्याला मंत्रिपद देऊ नये. एक दलित नेतृत्व म्हणून संधी द्यावी, असे आठवले यांनी मोदींना सांगितले आहे. सूत्रांनी सांगितले की, मित्र पक्षांत दलित नेत्यालाच मंत्रिपद द्यायचे तर मोदी यांची पसंती माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना असेल. आठवले यांना भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पाठोपाठ मंत्रीपद देण्याची भाजपाची वा मोदींची कुठलीही इच्छा नाही. मंत्रिपद मिळाले नाही तर महायुतीतून बाहेर पडण्याची भाषा आठवले यांनी केली तरीही त्यांच्या धमक्यांना भीक घालायची नाही, या निर्णयाप्रत भाजपा नेते आले आहेत. भाजपा स्वबळावरच बहुमतात असताना मित्र पक्षांच्या दबावात येण्याचा प्रश्नच नाही. त्यातही आठवलेंच्या पक्षाचा तर एकही खासदार नाही, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
आठवलेंना मंत्रिपद नाहीच!
By admin | Updated: May 19, 2014 23:26 IST