आर्थिक अस्पृश्यता मिटवा - पंतप्रधान मोदींचं आवाहन
By admin | Published: August 28, 2014 05:19 PM2014-08-28T17:19:45+5:302014-08-28T17:39:43+5:30
महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा. २६ जानेवारी पर्यंत साडेसात कोटी गरीबांना पंतप्रधान जन-धन योजनेमध्ये सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. आज या योजनेचे उद्गाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी एक कोटीपेक्षा जास्त गरीबांना बँक खाते व एक लाख रुपयाचा विमा देण्यात आला. यावेळी २६ जानेवारीपर्यंत खाते उघडणा-या गरीबांना ३० हजार रुपयाच्या अतिरिक्त विम्याचीही घोषणा केली.
देशातील ४० टक्के गरीब जनतेचे कोणत्याही बँकेत खाते नाही. त्यामुळे ही जनता अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात न आल्याने ख-या अर्थाने अस्पृश्य (अनटचेबल )असल्याचे मोदी म्हणाले. या गरीबांना जर आर्थिक प्रवाहात आणले तर गरीबी दूर करण्यास सहाय्य होईल असेही त्यांनी सांगितले. महिला दिवसभर कष्ट करतात व पैसे कमावतात, परंतु व्यसनी नवरा ते पैसे उडवील अशी भीती असते, असे सांगत आता या महिला बँकेत आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतिल असे मोदी म्हणाले.
बँकिग क्षेत्रातला व आपला अनुभव सांगताना मोदी म्हणाले की श्रीमंत व्यक्तींच्या दारात बँका कर्ज देण्यासाठी जातात व कमी व्याजात कर्जवाटप करतात. त्याचवेळी गरीब मात्र सावकाराकडून पाचपट दराने कर्ज घ्यायला मजबूर होतात आणि शेवटी ते आत्महत्या करतात. त्यापढे जात गरीब व्यक्ती ९९ टक्के वेळा कर्ज बुडवत नाहीत, व ती महिला असेल तर १०० टक्के वेळा कर्ज बुडवत नाही असे सांगत बँकांची कर्जे श्रीमंतच बुडवतात असेही त्यांनी सांगितले.
गरीबांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा आणि आपले लक्ष्य २६ जानेवारीच्या आतच पूर्ण करावे अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधान जन धन योजना हे गरीबी हटविण्यासाठी उचलेलं पाऊल असून या योजनेमुळे देशातील आत्महत्या कमी होण्यास तसेच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडणा-या व्यक्तीस डेबीट कार्ड आणि एक लाख रूपयांचा विमा मिळणार आहे.