मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असताना एकमेकांवर विखारी टीका केली जात आहे. तरीही आदर्श आचारसंहिता जपण्याचे काम मुंबईच्या उमेदवारांनी केले आहे.गेल्या २४ दिवसांत मुंबई शहरात एकाही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ दिवसांत मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत केवळ २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हे भायखळा विधानसभा मतदारसंघात दाखल झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले आहेत, त्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात नाही. दरम्यान, दाखल गुन्ह्यांपैकी पहिला गुन्हा २४ सप्टेंबर रोजी एआयएमआयएम पक्षाचे आमदार आमिर इद्रीस अकबरूद्दीन ओवेसी यांच्याविरोधात दाखल झाला आहे. नागपाडा येथे विनापरवानगी जाहीर सभा घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा शिवसेनेच्या गणेश महांगरे यांच्यावर नोंद झाला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र असलेले पोस्टर विनापरवानगी लावल्याप्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
आचारसंहिता भंगाचे दोन उमेदवारांवर गुन्हे
By admin | Updated: October 6, 2014 03:56 IST