उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
सात जण दगावले : धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सिअस
उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम
सात जण दगावले : धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सिअसनवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे. उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे घडलेल्या रस्ता अपघातात सातजण मृत्युमुखी पडले. राज्यात गुरुवारी दाट धुक्यामुळे रेल्वे आणि सडक वाहतूक विस्कळीत झाली.उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर येथे सर्वांत कमी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मैनपुरी येथे दोन आणि बदायूँ व बाराबंकी येथे प्रत्येकी एक जण रस्ता अपघातात ठार झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी असल्याने हे अपघात घडले. तर बाराबंकी येथे दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला.पंजाबात पारा घसरलापंजाबात थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये थंडीची लाट कायम असून पारा घसरला आहे. अमृतसर येथे गुरुवारी ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडी आणि धुक्यामुळे वाहतूकही ठप्प पडली आहे.काश्मिरात तापमान शून्याखालीकाश्मीर खोऱ्यातील तापमान शून्याखाली गेले आहे. राजधानी श्रीनगर येथे गुरुवारी तापमान उणे ३.९ अंश सेल्सिअस होते. तर लडाख येथे सलग सातव्या दिवशी तापमान उणे १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान शून्याखाली गेल्याने प्रसिद्ध डल सरोवर गोठण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त आहे. गुरुवारी कारगीलमध्ये उणे १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)