देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून या पुलाचे उद्घाटन केले. उद्घाटनावेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. हा रेल्वे पूल जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे. या पुलामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होईल आणि वेळही वाचेल.
चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम करणे अवघड मानले जाते. मात्र, तरीही अभियंत्यांनी चिनाब पुलाचे काम यशस्वी पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी चिनाब पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर आज या पुलाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा पूल जम्मू आणि काश्मीरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
चिनाब पूल प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २२ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या पुलाचे काम पूर्ण झाले. २७२ किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग देशाला समर्पित केला जाईल. हा पूल चिनाब नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंच आहे. हा पूल पॅरिसच्या एफिल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे.