पातूर: शहरातील सिंगर नाला ते स्मशानभूमीपर्यंतच्या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पातूर येथील शेतकर्यांनी केली असून, या संदर्भात पातूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.शहरात सिंगर नाला ते स्मशानभूमीपर्यंत शेतरस्ता असून, या रस्त्याचा उपयोग पातूर तसेच भंडारज परिसरात जिरायत शेती असलेल्या शेतकर्यांना शेतात जाण्या-येण्यासह मालाची ने-आण करण्यासाठी होतो. मागील वर्षी या रस्त्याचे काम मंजूर झाले होते; परंतु हे काम रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांद्वारे न करता संबंधित ठेकेदाराने मशीनद्वारे केले. रस्त्यावर भराव टाकून व आजूबाजूच्या शेतातील काळी माती टाकून रस्त्याचे काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात आले. रस्त्यावर जाडा मुरूम टाकला नाही. दबाईसुद्धा करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी, मालाची ने-आण करण्यासाठी या रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणे दूरच, पायी चालणेही अशक्यच झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी पातूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी परशराम उंबरकार, रवी ढोकणे,अजय मालसुरे, उद्धव आवटे, बाळू उगले, मोहन गाडगे, उमेश परमाळे उपस्थित होते.
शेतरस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
By admin | Updated: May 13, 2014 20:26 IST