ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी दिलेल्या भाषणात बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र व्हावे, यांचे जाहीरपणे समर्थन केले. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनं मोदींवर जोरदार टीका केली आहे.
मोदींच्या पाकव्याप्त बलुचिस्तानच्या मुद्द्यावर केलेल्या भाष्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. "पाकव्याप्त काश्मीर हा आपला हक्क आहे. मात्र त्यामध्येच बलुचिस्तानचा विषय आणून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अडचणीत सापडू शकतो. आपणच हा मुद्दा संवेदनशीलरीत्या हाताळत नसल्याचं" म्हणत सलमान खुर्शीद यांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.
"आपण शेजारील देशातल्या अत्याचाराबाबत न बोलता असे विषय उपस्थित केल्यास पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळेल", असंही सलमान खुर्शीद म्हणाले आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीरऐवजी बलुचिस्तानचा विषय उपस्थित करण्याचा सल्ला कोणी दिला हे माहीत नसल्याचं म्हणत खुर्शीद यांनी मोदींवर शरसंधाण साधलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणांविषयी अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचा टोलाही यावेळी सलमान खुर्शीद यांनी लगावला आहे.